भोंदू बाबा अशोक खरातप्रकरणी रुपाली चाकणकर पुन्हा अडचणीत, आता नेमकं काय घडलं?
नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. खरातच्या वडिलांच्या २०१७ मधील दशक्रिया पत्रिकेवर रूपाली चाकणकर यांचे नाव आढळल्याने राजकीय चर्चांना उधाण आले असून तपासाची दिशा बदलण्याची शक्यता आहे.

नाशिकमधील स्वयंघोषित आध्यात्मिक भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करण्यात आली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे. याप्रकरणी सध्या नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. आता अशोक खरातप्रकरणी एका जुन्या कागदपत्राने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. २०१७ मधील अशोक खरातच्या वडिलांच्या निधनानंतरची दशक्रिया पत्रिका सध्या समोर आली आहे. त्यावर चक्क राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे नाव शोकाकुल म्हणून छापण्यात आल्याचे समोर आले आहे. या नव्या धाग्यामुळे प्रकरणाला आता गंभीर राजकीय वळण मिळाले आहे.
नेमकं प्रकरण काय?
अशोक खरात हा सिन्नर तालुक्यातील मीरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर आणि शिवानिका संस्थानाचा संस्थापक म्हणून ओळखला जातो. स्वतःला कॅप्टन म्हणवून घेणाऱ्या अशोक खरातवर फसवणूक आणि भोंदूगिरीचे गंभीर आरोप झाले आहेत. त्यामुळे तो वादाच्या भोऱ्यात सापडला आहे. मात्र, आता त्याच्या वडिलांच्या निधनानंतर होणाऱ्या दशक्रिया विधीची पत्रिका समोर आली आहे. ही पत्रिका नोव्हेंबर २०१७ मधील आहे. अशोक खरातचे वडील कै. एकनाथ त्र्यंबक खरात यांच्या निधनानिमित्त ही पत्रिका छापण्यात आली होती.
या पत्रिकेच्या सर्वात खाली असलेल्या शोकाकुल यादीत रूपाली चाकणकर यांचे नाव ठळकपणे पाहायला मिळत आहे. एका भोंदू बाबाच्या घरगुती कार्यक्रमाच्या पत्रिकेवर इतक्या मोठ्या राजकीय नेत्याचे नाव असणे, यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
ही पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. रूपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मोठ्या नेत्या आहेत. त्यांचे नाव या पत्रिकेवर शोकाकुल म्हणून असणे याचा अर्थ खरात कुटुंबियांशी त्यांचे अत्यंत निकटचे किंवा कौटुंबिक संबंध असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे.
२०१७ मध्ये अशोक खरात आणि रूपाली चाकणकर यांच्यात नेमके काय संबंध होते? भोंदूगिरीचे साम्राज्य उभे करताना खरातला राजकीय राजाश्रय मिळत होता का?एका गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीच्या घरगुती पत्रिकेवर राजकीय नेत्याचे नाव येणे हा केवळ योगायोग आहे की जाणीवपूर्वक दिलेला पाठिंबा? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
आतापर्यंत पोलीस केवळ खरातच्या आर्थिक व्यवहारांची आणि भोंदूगिरीची चौकशी करत होते. मात्र, या पत्रिकेमुळे आता तपासाची सुई राजकीय प्रभावाकडे वळली आहे. खरातने आपल्या संस्थानच्या नावाखाली अनेक बड्या हस्तींशी संपर्क वाढवला होता का, याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. या पत्रिकेमुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले असून, आगामी काळात हे प्रकरण चांगलेच गाजणार असल्याचे दिसत आहे.
