नाशिक प्रकरणानंतर टीसीएसचा मोठा निर्णय, आता महाराष्ट्रात…
नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत महिलांचे लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतराचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली असून, खबरदारीचा उपाय म्हणून कंपनीने संपूर्ण महाराष्ट्रातील भरती प्रक्रिया स्थगित केली आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) सारख्या नामांकित कंपनीच्या नाशिक येथील एका केंद्रात एक अत्यंत संतापजनक आणि खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण आणि बळजबरीने धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून टीसीएसने एक मोठा निर्णय घेतला आहे. टीसीएसने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील नवीन भरती प्रक्रिया तूर्तास स्थगित केली आहे.
नेमके प्रकरण काय?
नाशिकमधील टीसीएस केंद्रात कार्यरत असलेल्या काही वरिष्ठ टीम लीडर्सनी एका विशिष्ट कार्यपद्धतीने कर्मचाऱ्यांना टार्गेट केल्याचा संशय आहे. एका पीडित तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या कौटुंबिक अडचणींचा आणि वडिलांच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन त्याला धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्यात आले. इस्लाम स्वीकारला तरच वडील बरे होतील असे सांगून त्याला नमाज, रोझा आणि बीफ खाण्यासाठी भाग पाडल्याचे समोर आले आहे.
त्यासोबतच अनेक महिला कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांवर अश्लील वर्तन आणि लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. कामाचा ताण वाढवणे किंवा नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देऊन महिलांचे शोषण केले जात होते, असेही समोर आले आहे. या प्रकरणाच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी काही विशिष्ट व्हॉट्सॲप ग्रुप्स बनवले होते. या ग्रुप्सच्या माध्यमातून तरुण कर्मचाऱ्यांचे ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न सुरू होता.
या प्रकरणी नाशिक पोलिसांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. या अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी तौसीफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन आणि शफी शेख यांच्यासह एकूण 7 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील महत्त्वाची दुवा मानली जाणारी एचआर (HR) निदा खान ही फरार असून तिने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.
नाशिकमधील कार्यालयातील अंतर्गत हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी महिला पोलिसांना हाऊसकीपिंग स्टाफ बनवून प्रत्यक्ष कामावर पाठवले होते. ज्यामुळे अनेक गोपनीय माहिती हाती लागली. सध्या पोलिसांनी आपला मोर्चा कंपनीच्या भरती प्रक्रियेकडे वळवला आहे. नाशिक केंद्रात गेल्या काही वर्षांत झालेल्या नियुक्त्यांमध्ये एखाद्या विशिष्ट टोळीने जाणीवपूर्वक ठराविक मानसिकतेच्या लोकांची वर्णी लावली होती का? याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी कंपनीकडून सर्व कर्मचाऱ्यांचा सविस्तर डेटा, त्यांचे बॅकग्राउंड चेक आणि भरतीची कागदपत्रे जप्त करण्यास सुरुवात केली आहे.
महाराष्ट्रात नोकरभरती स्थगित
या संपूर्ण घटनेचा परिणाम केवळ नाशिकपुरता मर्यादित न राहता संपूर्ण राज्यावर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर कंपनीच्या जागतिक प्रतिमेला तडा जाऊ नये आणि अंतर्गत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यासाठी टीसीएसने महाराष्ट्र राज्यातील सर्व नवीन भरती प्रक्रिया थांबवली आहे. जोपर्यंत पोलिसांचा तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत नवीन नियुक्त्या केल्या जाणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.