
नाशिकमधील काळाराम मंदिराच्या परिसरात आक्षेपार्ह पत्रके वाटण्यात आले होते. या पत्रकारावर काळाराम मंदिर आसपास असणाऱ्या विशिष्ट समाजातील लोकांना मंदिरात प्रवेश वर्ज्य असल्याचे म्हटले होते. त्यावरून राज्यात मोठा गदारोळ निर्माण झाला होता. नाशिकमध्ये शनिवारी (२२ जून) पंचवटी परिसरात चार तास तणावाचे वातावरण होते. या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. हे पत्र प्रसिद्ध करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या व्यक्तीशी असलेल्या वैमनस्यातून हा प्रकार केला गेल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
माध्यमांशी नाशिकमधील प्रकाराबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्या पत्रासंदर्भात सर्व माहिती पोलिसांनी काढलेली आहे. काळाराम मंदिराच्या आसपास राहणाऱ्या लोकांना धमकी देणारे पत्र काढण्यात आले होते. ते पत्र पब्लिश प्रसिद्ध करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे. दुसऱ्या व्यक्तीशी असलेल्या वैमनस्यातून हे पत्र काढले गेले आहे. हे पत्र काढणारा व्यक्ती अनुसूचित जातीचाच आहे. त्यामागे काय कारण आहे, हे शोधले जात आहे.
आरोपीकडून चार मोबाईल, दोन लॅपटॉप जप्त केले आहे. त्या व्यक्तीच्या पाठिशी कोण आहेत? दंगल घडवण्यासाठी त्याने हे पत्र काढले आहे का? ज्याच्या नावाने पत्र काढले, त्याच्याशी त्याचे काय वैर होते. त्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी त्याने पत्र काढले आहे का? या सर्व प्रश्नांची चौकशी नाशिक पोलीस करत आहे. हे पत्र काढून पत्र सोशल मीडियावर टाकायचे आणि लोकांमध्ये गैरसमजुती निर्माण करून दंगा घडवण्याचे प्रयत्न यापुढेही होऊ शकतात. त्याकडे पूर्ण लक्ष ठेवून आम्ही आहोत.
काही राजकीय नेत्यांनी हे पत्र ट्विट केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्याकडून हा प्रकार झाला. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, या प्रकारात शहानिशा न करता वस्तुस्थिती न तपासता तसे पत्र व्हायरल केल्यास समाजात तेढ निर्माण होईल. यामुळे राजकीय नेत्यांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखली पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.