Nashik | सहकाराला बट्टा, येवल्यात सुभाषचंद्र पारख नागरी पतसंस्थेवर अवसायक, जिल्हा उपनिबंधकांनी का केली कारवाई?

| Updated on: Feb 07, 2022 | 3:51 PM

येवला तालुक्याचा सहकार क्षेत्रात मोठा दबदबा. सहकाराच्या क्षेत्रातूनच येथील पतसंस्थांनी कोट्यवधींच्या उलाढली केल्या. अनेकांच्या संसाराला हात लावले. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या क्षेत्रालाही बट्टा लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे एकामागून एक सहकारी संस्थावर कारवाई सुरू आहे.

Nashik | सहकाराला बट्टा, येवल्यात सुभाषचंद्र पारख नागरी पतसंस्थेवर अवसायक, जिल्हा उपनिबंधकांनी का केली कारवाई?
प्रातिनिधिक छायाचित्र.
Follow us on

येवलाः नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या येवल्यातील बहुचर्चित अशा कै. सुभाषचंद्र पारख नागरी सहकारी पतसंस्थेवर अवसायक नियुक्तीचे आदेश जिल्हा उपनिबंधक (District Deputy Registrar) सतीश खरे यांनी काढले आहेत. या पतसंस्थेचे 18 हजारांवर ठेवीदार असून, त्यांच्या 70 कोटी 18 लाख रुपयांच्या ठेवी ‘डीआयसीजीसी’चे विमा संरक्षण नसल्यामुळे कर्जदाराकडून वसुली केल्यानंतरच परत मिळू शकणार आहेत. त्यामुळे ठेवीदारांच्या हा पैसा पतसंस्थेतच अडकला आहे. त्यामुळे त्यांचे धाबे दणाणले आहे. खरे तर येवला तालुक्याचा सहकार क्षेत्रात मोठा दबदबा. सहकाराच्या क्षेत्रातूनच येथील पतसंस्थांनी कोट्यवधींच्या उलाढाली केल्या. अनेकांच्या संसाराला हात लावले. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या क्षेत्रालाही बट्टा लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे एकामागून एक सहकारी संस्थावर कारवाई सुरू आहे. त्यात अखेर बहुचर्चित अशा सुभाषचंद्र पारख नागरी पतसंस्थाही गोत्यात आली आहे.

सहकारी संस्थांचे जाळे

येवल्यात एकूण 303 सहकारी संस्था आहेत. त्यात राष्ट्रीयकृत संस्था 14, जिल्हा बँक शाखा 10, सहकारी बँका 3, पतसंस्था 42, पगारदार पतसंस्था 13, वि. का. सोसायट्या 83, ख. वि. संघ 1, मजूर संघ 89, गृहनिर्माण संस्था 3, औद्योगिक वसाहत 1, मान्यताप्राप्त सावकार 2 यांचा समावेश आहे. येवल्यातील या सहकाऱ्याच्या जाळ्यामुळे या दुष्काळी भागात अनेकांनी चांगला विकासही केला. मात्र, यातल्या काही सहकारी संस्था, पतसंस्था कायम वादाच्या भोवऱ्यात राहिल्या. त्यांनी सुरुवातीला काही काळ चांगले काम केले. जम बसवला. मात्र, नियमबाह्य कर्जवाटपाने साऱ्यांनाच गोत्यात आणले. त्यात हजारो ठेवीदार भरडले गेले.

पतसंस्था संशयाच्या भोवऱ्यात

जळगावमधील भाईचंद रायसोनी मल्टीस्टेट. या पतसंस्थेनेही असाच कारभार केला. सुरुवातीला चढे व्याजदर देत ग्राहकांना आकर्षित केले. मात्र, काही काळ लोटताच ही पतसंस्थाही आर्थिकदृष्ट्या कोलमडली. अनेक ठेवीदारांच्या कोट्यवधींच्या ठेवी या पतसंस्थेत अडकून पडल्यात. त्याविरोधात कित्येक आंदोलने झाली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेबाबतही असेच झाले. थकलेल्या कर्जवसुलीमुळे अनेकांच्या ठेवी या बँकेत अडकून पडल्या होत्या. मर्चंट्स बँकेबाबतही अशाच अफवा होत्या. मात्र, त्यांचा कारभार पुन्हा सुरळीत सुरू झाला. गेल्या काही दिवसांपासून सुभाषचंद्र पारख नागरी पतसंस्था चौकशीच्या फेऱ्यात होती. अखेर या पतसंस्थेवर अवसायल नियुक्तीचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी काढले आहेत.

इथेही मुरले पाणी…

नगरसूल येथील संत जनार्दन स्वामी पतसंस्थेतही असेच नियमबाह्य कर्जवाटप झाले होते. त्यामुळे तब्बल 1 कोटी 68 लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका लेखापरीक्षकांनी ठेवला होता. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने पतसंस्थेचे दप्तर चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. पुढील कारवाई अजूनही सुरू आहे. तर श्री. गुरुदेव नागरी सहकारी व धनश्री महिला पतसंस्थांचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले. त्यांनी अनेक नियमांचे पालन केले नाही. विशेषतः नियमबाह्य कर्जवाटप हे महत्त्वाचे कारण होते. याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला. पुढे कारवाई सुरू आहे. राज्यभरातील कुठल्याही घोटाळा झालेल्या पतसंस्थेत असेच होते. प्रशासक येतो. गुन्हे दाखल होतात आणि अनेक दोषी संचालक फरार असतात. वर्षानुवर्षे ही प्रकरणे चालतात. मात्र, त्यात ठेवीदारांची प्रचंड आर्थिक कोंडी होती.

इतर बातम्याः

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Lata Mangeshkar | अवघ्या 13व्या वर्षी पहिलं रेकॉर्डिंग! असा होता 80 वर्षांचा म्युझिकल प्रवास

Lata Mangeshkar | निर्विवाद तजेलदार! आईसाठी तर आवाज दिलाच, पण लेकीसाठीही लतादीदींनी गाणी गायली