‘एकनाथ शिंदे घाबरले, आता मी ठाण्यात येतो, आणि…’, आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना नवं चॅलेंज

| Updated on: Feb 06, 2023 | 8:56 PM

राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना चॅलेंज दिलं आहे.

एकनाथ शिंदे घाबरले, आता मी ठाण्यात येतो, आणि..., आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना नवं चॅलेंज
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना चॅलेंज दिलं आहे. आदित्य ठाकरे यांनी नुकतंच मुख्यमंत्र्यांना चॅलेंज दिलं होतं. एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्रिपदाचा तसेच आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि वरळीतून आपल्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवावी, असं चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी दिलं होतं. त्यांच्या या चॅलेंजवर शिंदे गटाकडून टीका करण्यात आली होती. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या या चॅलेंजला दोन दिवस होत नाही तेवढ्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा चॅलेंज देत डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. आदित्य यांनी यावेळी मुख्यमंत्री घाबरले असल्याचं विधान केलंय. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या नव्या चॅलेंजवर एकनाथ शिंदे काय भूमिका मांडतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्या चॅलेंजला घाबरले. मी दुसरं चॅलेंज देतो, तुम्ही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या, मी राजीनामा देतो. मी ठाण्यात येतो. तिथे लढून दाखवतो, बघू कोण जिंकून येतंय, एकदा होऊनच जाऊ द्या”, असं नवं चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय.

“महाराष्ट्रातलं वातावरण पेटलेलं आहे. आता एकच रंग दिसेल तो म्हणजे भगवा. काही लोकांना वाटेल कोणता भगवा? मात्र शिवसेना एकच, ती माझ्यासमोर बसलेली आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा


“विधान परिषदेच्या पदवीधर निवडणुकीतून एक चित्र स्पष्ट दिसतंय. मविआनं गरुडझेप घेतलेली आहे. मी बोलतो आज निवडणुका घ्या. बघुया कोण जिंकतंय”, असंही ते म्हणाले.

“मी काही सुरता पळून जात नाही. गद्दारी कोणाला पटली नाही. ४० गद्दार सुरतला गेले आहेत. तिथून गुवाहाटी, तिथून गोवा. त्यांच्या मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत. मात्र खोके एकदम ओके सुरुय”, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

“पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले याचा त्यांना आनंद व्हायला हवा होता. मात्र झाला नाही. आपला पारंपरिक मतदार नव्हता तो देखील शिवसेनेसोबत उभा आहे”, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.

“मंत्रालयात गलिच्छ राजकारण आज दिसत आहे. जनता आपल्यासोबत उभी आहे. उद्धव ठाकरेंवर ४० वार झालेत. पण त्यांनी कोरोना काळात गद्दारी केली आहे”, अशी टीका त्यांनी केली.

“कोरोना काळात आम्ही पारदर्शकपणे काम करत होतो. मुख्यमंत्री तीच जुनी कॅसेट सुरु आहे. सहा महिन्यांपूर्वीच्या घटनांमध्ये अडकले आहेत. क्रिकेटच्या मॅचला गेले की वर्ल्डकप जिंकला म्हणतात”, असा टोला त्यांनी लगावला.

“भाजपचे आयटी सेलवाले मला शिव्या देतात”, असा दावा त्यांनी केला. तसेच “चोरी करायला 40 लोकंच लागतात”, अशीदेखील टीका त्यांनी केली.