“…म्हणून शेतकऱ्यांनी अग्निडाग समारंभाचे केले आयोजन”; पडत्या भावामुळे पंतप्रधानांना लिहिले रक्ताने पत्र

| Updated on: Feb 20, 2023 | 7:56 PM

"कांदा अग्निडाग" समारंभ पत्रिकेची तसेच रक्ताने लिहिलेल्या पत्राची दाखल होळी अगोदर घेणार का, की हा "कांदा अग्निडाग" समारंभ पार पडू देणार याकडे राज्यातील कांदा उत्पादकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

...म्हणून शेतकऱ्यांनी अग्निडाग समारंभाचे केले आयोजन; पडत्या भावामुळे पंतप्रधानांना लिहिले रक्ताने पत्र
Follow us on

लासलगावः पोटच्या पोराप्रमाणे पिकवलेल्या कांद्याला बाजार भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्च तर दूर वाहतूक आणि मजुरीही निघणार नसल्याने ऐन होळीच्या दिवशी “कांदा अग्निडाग” समारंभ ठेवण्याची नामुष्की येवला तालुक्यातील मातुलठाण येथे ठेवण्यात आल्याची पत्रिका सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाली आहे. अनेक लग्नपत्रिका सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेचा विषय ठरल्याचे आपण बघितले आहे. मात्र लग्नपत्रिकेसारखीच एक पत्रिका सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या पत्रिकेमध्ये चि. कांदा शेतकऱ्यांना खड्ड्यात गाडून टाकणारा सर्व शेतकऱ्यांच्या लाडक्या कांदाचे ऐन होळीच्या दिवशी “कांदा अग्निडाग” समारंभ आयोजित केला आहे.

येवला तालुक्यातील मातुलठाण येथील तरुण कांदा उत्पादक शेतकरी कृष्णा डोंगरे व कुटुंबाने समारंभ आयोजित केला आहे. तर यामध्ये या पत्रिकेत आशीर्वाद भारत सरकार तर प्रमुख उपस्थिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार तर प्रेषक म्हणून महाराष्ट्रातील संपूर्ण मीडिया, संयोजक – महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटना, व्यवस्थापक – महाराष्ट्रातील शेतकरी मित्रपरिवार तसेच “कांदा अग्निडाग” समारंभ स्थळ – मातुलठाण, ( नगरसूल – मातुलठाण रोड, तालुका येवला जिल्हा नाशिक ) येथे आयोजित केला असल्याचे उल्लेख पत्रिकेमध्ये करण्यात आला आहे.

याबरोबरच हा तरुण शेतकरी कुष्णा डोंगरे न थांबता पत्रिका आणि रक्ताने लिहिलेला पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर, काँग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी उपमुख्यमंत्री येवला-लासलगाव मतदार संघाचे आमदार छगन भुजबळ, यासह राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांना पोस्टाने पाठवण्यात आले आहे.

“कांदा अग्निडाग” समारंभ पत्रिकेची तसेच रक्ताने लिहिलेल्या पत्राची दाखल होळी अगोदर घेणार का, की हा “कांदा अग्निडाग” समारंभ पार पडू देणार याकडे राज्यातील कांदा उत्पादकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

कांदा उत्पादक शेतकऱ्याने रक्ताने लिहिलेल्या पत्र आणि कांदा अग्निडाग समारंभाच्या पत्रिका सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याने याची सध्या जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

रक्ताने लिहिलेल्या पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असल्याने आता सरकार याकडे लक्ष देणार की नाही असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.