2014लाच शिवसेना संपवण्याचा डाव होता; उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानातून उद्धव ठाकरे यांची तोफ पुन्हा एकदा धडाडली. उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी भाजपवर युती तोडण्याचा आणि शिवसेना फोडण्याचा आरोप केला. शिवसेना फोडण्याचं कारस्थान फार पूर्वीपासून सुरू होतं. एका जबाबदार नेत्यांनेच आपल्याला त्याची माहिती दिली होती, असा दावा उद्धव ठाकरे यांनी करून खळबळ उडवून दिली आहे.

2014लाच शिवसेना संपवण्याचा डाव होता; उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा
Uddhav Thackeray
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 23, 2024 | 9:05 PM

नाशिक | 23 जानेवारी 2024 : दोन वर्षापूर्वी शिवसेना फुटली. त्यामुळे एकच खबळ उडाली. 2022 मध्ये शिवसेना फुटली असली तरी 2014मध्येच शिवसेना फोडण्याचा भाजपचा डाव होता. उद्धव ठाकरे यांच्यात कुवत नसल्याचं भाजपच्या नेत्यांना वाटत होतं. त्यामुळेच त्यांनी शिवसेना फोडण्याचा घाट घातला होता. याच कारणास्तव शिवसेना आणि भाजपची युतीही तुटली होती, असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांनी केला आहे. नाशिकमधील विराट जनसभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी हा दावा केला आहे.

मी शिवसेनाप्रमुखांचे विचार सोडले असं म्हणत असतील तर 2014 साली शिवसेनेशी युती का तोडली होती? एकनाथ खडसे नाशिमध्येच सांगितलं आहे, 2014च्या मेपर्यंत आ गले लग जा सुरू होतं. मला दिल्लीत बोलावलं होतं, राष्ट्रपतींना पाठिंबा देण्याच्या पत्रावर सही करायला. तोपर्यंत शिवसेना हिंदुत्ववादी होती. नंतर जून ते ऑक्टोबरमध्ये असं काय घडलं की तुम्ही शिवसेनेची युती तोडली, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

पण बाळासाहेब आजही सर्वांच्या मनात

आजही ती व्यक्ती जिवंत आहे. भाजपमधील ती जबाबदार व्यक्ती आहे. 2014मध्ये भाजपने युती तोडली. शिवसेनेने कुणाच्याही मदतीशिवाय 63 आमदार निवडून आणले होते. तेव्हा हेच दाढीवाले बुवा विरोधी पक्षनेते होते. तेव्हा ती व्यक्ती आली आणि म्हणाली, उद्धव मला तुझं अभिनंदन करायचं आहे. म्हटलं का? तर म्हणाले, दिल्लीत अशी चर्चा होती. आता बाळासाहेब राहिले नाही (बघा किती हरामी लोकं आहेत) त्यांना वाटतं बाळासाहेब गेले. पण आजही बाळासाहेब आपल्या मनात आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

असा काय गुन्हा केला होता?

आता बाळासाहेब राहिले नाही. उद्धव ठाकरे काही करू शकत नाहीत आणि शिवसैनिक उद्धव सोबत जाणार नाहीत. आता वेळ आलीय शिवसेनेला संपवायची. शिवसेनेचे पाच किंवा 10 सीट येतील, असा विचार दिल्लीत 2014मध्ये सुरू होता. पण तू कमाल केली. तू 63 जागा जिंकल्या. दिल्ली तुला आता घाबरतेय, असं हा नेता म्हणाला. 2014 साली शिवसेनेला खतम करणारी ही लोकं… काय आम्ही तुमचा गुन्हा केला होता? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.