आपल्याकडे 54 आमदार आहेत म्हणजे आभाळाला हात लागले नाही, अधिक ‘करेक्टपणे’ पक्ष चालवण्याची गरज; जयंत पाटलांचे कार्यकर्त्यांना डोस

| Updated on: Oct 01, 2021 | 8:07 PM

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून पक्षबांधणीवर जोर दिला आहे. नाशिकमध्ये ही यात्रा आल्यावर पाटील यांनी थेट कार्यकर्त्यांनाच कानपिचक्या दिल्या आहे. (Jayant Patil)

आपल्याकडे 54 आमदार आहेत म्हणजे आभाळाला हात लागले नाही, अधिक करेक्टपणे पक्ष चालवण्याची गरज; जयंत पाटलांचे कार्यकर्त्यांना डोस
jayant patil
Follow us on

नाशिक: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून पक्षबांधणीवर जोर दिला आहे. नाशिकमध्ये ही यात्रा आल्यावर पाटील यांनी थेट कार्यकर्त्यांनाच कानपिचक्या दिल्या आहे. आपल्याकडे 54 आमदार आहेत म्हणजे आभाळाला हात लागले नाहीत. अजूनही अधिक करेक्टपणे पक्ष चालवण्याची गरज आहे, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांचे कान उपटले आहेत. (Work hard to make NCP strong, jayant patil appealed to party workers)

जयंत पाटील यांनी आज सकाळी श्रीरामपूर, रहाता, येवला – लासलगाव विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. त्यानंतर दुपारनंतर निफाड विधानसभा मतदारसंघाचा आढावाही त्यांनी घेतला. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आपण 54 जागांवर आहोत म्हणजे आभाळाला हात लागले असे नाही. यासाठी अधिक करेक्टपणे पक्ष चालवण्याची गरज आहे. आपल्याला पक्षाची प्रगती करायची असेल तर शरद पवारांचा झंझावात बोलून चालणार नाही तर त्यांचे विचार, पक्षाची ध्येयधोरणे रुजवण्याची गरज आहे, असे पाटील यांनी सांगितले.

तर भाजपात जाणारे थांबले असते

आपल्याला कार्यकर्ता वैचारिकदृष्ट्या उभा करण्याची गरज आहे. विचारावर आधारित कार्यकर्ते निर्माण केले असते तर जे भाजपात जाणारे होते तेही थांबले असते. भाजपच्या भुलथापांना भुलले नसते. वैचारिक लोकांची वानवा कार्यकर्त्यांमध्ये असल्याने भाजप सत्तेत आला होता, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं. दिलीप बनकर यांना ज्या उत्साहाने निवडून आणले त्याच उत्साहाने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातही यश मिळवा, असे आवाहनही त्यांनी केले.

काँग्रेस आता लहान भाऊ

भविष्यात शिवसेना व काँग्रेस या दोन्ही पक्षांशी मिळून काम करायचे आहे. मागच्या वेळी काँग्रेस हा मोठा भाऊ होता आणि आपण लहान. यावेळी मात्र काँग्रेस लहान भाऊ आहे आणि आपण मोठा भाऊ आहोत. परंतु लहान – मोठा असं काही नसतं. आपल्याला एकमेकांच्या सोबतीने काम करायचे आहे, असं त्यांनी सांगितलं. पक्ष सत्तेत आल्यावर लोकांच्या मागण्या काय आहे. अपेक्षा काय आहे हे जाणून घेण्यासाठी ही परिवार संवाद यात्रा आहे, असंही त्यांनी सांगितलं.

थेट नांदूर मधमेश्वर धरणाला भेट

निफाडमधील नांदूर -मधमेश्वर धरणातून जास्त पाणी सोडता येत नसल्याने दरवर्षी इथल्या 35 गावांना पूराचा मोठा धोका निर्माण होतो. ही माहिती आमदार दिलीप बनकर यांनी आज निफाड दौऱ्यावर असताना पाटील यांना सांगितल्यानंतर लोकांची समस्या जाणून घेण्यासाठी थेट नांदूर मधमेश्वर धरणाला पाटील यांनी भेट दिली. सध्या या धरणाला आठ दरवाजे आहेत. यात आणखी 10 दरवाजे वाढवले तर पाणी जाण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी मागणी आमदार दिलीप बनकर यांनी केली. यावर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी पाटील यांनी चर्चा केली. नवे दरवाजे तयार करण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करत लवकरच पावले टाकले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले. दरम्यान, या धरणाच्या परिसरात अभयारण्यही असल्याने इथे पर्यटनालाही मोठ्या प्रमाणात चालना देता येऊ शकते. त्यादृष्टीने पावले उचलण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.

 

संबंधित बातम्या:

मास्तराच्या मुलाची संपत्ती हजार बाराशे कोटींची कशी?, त्यांची चौकशी का होत नाही?; नाथाभाऊंचा सवाल

पिंपरी-चिंचवड पुन्हा काबिज करण्यासाठी शरद पवार मैदानात! आता भाजप काय रणनिती आखणार?

आता सरपंचालाही ईडीची नोटीस आली तर नवल वाटू नये; यशोमती ठाकूर यांचा बोचरा वार

(Work hard to make NCP strong, jayant patil appealed to party workers)