नवी मुंबईतील अनागोंदी कारभाराबाबत गणेश नाईकांनी आयुक्तांना धरले धारेवर

| Updated on: Sep 07, 2021 | 6:33 PM

राज्यात चालत असेल पण नवी मुंबईत बाराभाई कारभार चालू देणार नाही, असे ठणकावत याविरोधात लढण्यासाठी आम्ही तत्वर आणि तत्पर असल्याची प्रतिक्रिया आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केलीय.

नवी मुंबईतील अनागोंदी कारभाराबाबत गणेश नाईकांनी आयुक्तांना धरले धारेवर
नवी मुंबईतील अनागोंदी कारभाराबाबत गणेश नाईकांनी आयुक्तांना धरले धारेवर
Follow us on

नवी मुंबई : भाजपा आमदार गणेश नाईक यांनी आज मनपा आयुक्तांची भेट घेत नवी मुंबईत सुरू असलेल्या कारभारावरून आयुक्तांना चांगलेच धारेवर धरलंय. सध्या राज्याचा कारभार घाशीराम कोतवाल या प्रसिद्ध नाटकाप्रमाणे सुरू आहे. पेशव्यांनी पात्रता नसलेल्यांना अधिकार सोपवल्याने त्यांनी ज्याप्रकारे जनतेची लूट करत जुलूम केले तशी परिस्थिती राज्य, जिल्हा आणि नवी मुंबई स्तरावर सुरू असल्याचे वक्तव्य करत आमदार गणेश नाईकांनी महाविकास आघाडीसह नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंवर प्रहार केलाय. मनपात आयुक्तांना न मानणारे अधिकारी असून आपला बॉस दुसराच असल्याचे सांगतात असा गंभीर आरोप देखील नाईकांनी केलाय. राज्यात चालत असेल पण नवी मुंबईत बाराभाई कारभार चालू देणार नाही, असे ठणकावत याविरोधात लढण्यासाठी आम्ही तत्वर आणि तत्पर असल्याची प्रतिक्रिया आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केलीय. (BJP MLA Ganesh Naik’s warning to Navi Mumbai Municipal Commissioner)

जनतेची कामे अडविणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन

मर्जीतल्या लोकांच्या प्रभागात करोडो रूपयांची कामे काढणे, इतरांच्या वॉर्डात अत्यावश्यक कामांसाठी दिरंगाई करणे अशा पध्दतीने मंत्रालयातील बॉसच्या सांगण्यावरून वागणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना लोकशाही मार्गाने धडा शिकवू, असा इशारा लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी दिला आहे. प्रसंगी जेलमध्ये जाण्याची वेळ आली तरी चालेल, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला आहे.

महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याबरोबर लोकनेते आमदार नाईक यांची 48वी कोरोना प्रतिबंधात्मक आढावा बैठक आज पार पडली. ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी सभागृहनेते रविंद्र इथापे, स्थायी समितीचे माजी सभापती अनंत सुतार, माजी विरोधीपक्षनेते दशरथ भगत, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत आदी मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीत लोकप्रतिनिधींनी प्रभागांमध्ये नागरी विकासाची कामे करताना काही अधिकारी पक्षपातीपणा करीत असल्याची बाब निदर्शनास आणली. आयुक्त चांगले काम करीत असले तरी खालचे अधिकारी मनमानी कारभार करीत असल्याचे सांगितले. मर्जीतल्या लोकप्रतिनिधींच्या वॉर्डांमध्ये 100 कोटींची कामे काढली जातात परंतु अन्य प्रभागांमध्ये तेथील लोकप्रतिनिधी सातत्याने अत्यावश्यक सुविधांचा पाठपुरावा करीत असतात त्यांच्या प्रभागात कामे प्रलंबित ठेवण्यात येतात, असा आरोपही यावेळी लोकप्रतिनिधींनी केला. नागरी सुविधांची कामे काढताना सर्वच प्रभागात समान पध्दतीने कामे करण्याची मागणी संदीप नाईक यांनी यावेळी केली.

पालिका अधिकाऱ्यांना वसुलीचे टार्गेट असल्याचा आरोप

पालिका अधिकाऱ्यांना वरून वसुलीचे टार्गेट देण्यात आले आहे, असा धक्कादायक आरोप दशरथ भगत यांनी केला. काही अधिकारी हे टार्गेट पूर्ण करण्यात गुंतले असून त्यामुळे जनतेच्या कामाकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे भगत म्हणाले. लोकप्रतिनिधींच्या निवेदनांना अधिकाऱ्यांकडून उत्तरे मिळत नाहीत. पालिकेचा कारभार जणू मंत्रालयातून सुरू आहे असे सांगून भगत यांनी लोकनेते नाईक यांनी आदेश देताच या विरोधात रस्त्यावर उतरून लढाई लढू, असा इशाराच दिला. काही अधिकारी तर आयुक्तांना नाही तर मंत्रालयातून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांना आपला बॉस मानतात, अशी खळबळजनक माहिती रामचंद्र घरत यांनी दिली. यावर लोकनेते आमदार नाईक यांनी आतापर्यंत प्रभागनिहाय झालेल्या नागरी कामांचा अहवाल आयुक्तांनी द्यावा, अशी मागणी करीत पक्षपात करणाऱ्या अधिकाऱ्यांना लोकशाही माध्यमातून धडा शिकवू, असा इशारा दिला. (BJP MLA Ganesh Naik’s warning to Navi Mumbai Municipal Commissioner)

इतर बातम्या

JioPhone Next : सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन ‘या’ दिवशी बाजारात, लाँचिंगपूर्वी जाणून घ्या फोनमधील 8 महत्त्वाचे फीचर्स

मुल्ला बरादरचा ‘पत्ता कट’! मुल्ला हसन अखुंदकडे तालिबान सरकारचं नेतृत्व जाणार