नारायण राणे यांचं खासदारकीसाठी नाव सूचवलं अन् धमक्या आल्या; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
माजी मंत्री दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा उमेदवारीसाठी नाव सुचविल्याचा गौप्यस्फोट केला आहे. राणेंचं नाव पुढे येताच आपल्याला धमक्या मिळाल्या, थेट मंत्रिपदावरून बोलले गेल्याचा दावा केसरकर यांनी केला. राजकीय वैर संपवून राणेंच्या विजयासाठी आपण कसे प्रयत्न केले, याबाबतही त्यांनी माहिती दिली. हा खुलासा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे उभे राहावेत म्हणून मी त्यांचं नाव सूचवलं होतं. खासदारकीसाठी राणेंचं नाव सूचवणारा मी पहिलाच व्यक्ती होतो. मी राणेंचं नाव सूचवताच मला धमक्या आल्या. थेट मंत्रिपदावरून बोललं गेलं, असा गौप्यस्फोट राज्याचे माजी मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. येथील एका कार्यक्रमाला संबोधित करताना केसरकर यांनी हा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
नारायण राणेंना तिकीट मिळावं म्हणून मी सर्वात आधी आवाज उठवला होता. राणे साहेबांनी खासदारकीला उभं राहावं, असं सर्वात आधी मी म्हटलं. तोपर्यंत राणे साहेबांचं निवडणुकीला उभं राहण्याचं ठरलेलंही नव्हतं. परंतु, जे लोक इच्छुक होते, त्यांनी मला धमक्या दिल्या. राणेंचं नाव सूचवल्याने त्यांचा पोटशूळ उठला. त्यांनी धमक्या द्यायला सुरुवात केली. त्या धमक्यांचे व्हॉटसअप चॅट माझ्याकडे होते. ते डीलिट झाले, नाही तर दाखवले असते. तुम्ही राणेंचं नाव सूचवलं, तुम्ही मंत्री असणार नाही, अशा धमक्या मला दिल्या गेल्या, असा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला.
मंत्री नसलो तरी…
एक गोष्ट सांगतो, मनात असेल तर करायचं असतं. मी मंत्री असलो नसलो तरी साईबाबांची कृपा माझ्यावर आहे. माझं चांगलं चालू राहील. देवाच्या कृपेने आजोबा वडिलांचा वारसा आहे. माझं व्यवसायाकडे दुर्लक्ष झालं होतं. त्यामुळेच मंत्री नसणं कदाचित साईबाबांच्या मनात असेल. मी कुटुंबाकडे जे दुर्लक्ष केलं, त्याकडे लक्ष द्यावं असं साईबाबांना वाटत असेल. माझं कुटुंब म्हणजे स्वत:चं कुटुंब नाही, सावंतवाडीची जनता ही माझं कुटुंब आहे. एवढा कार्यक्रम असातनाही मी पहिलं प्राधान्य मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला दिली आहे, असं केसरकर म्हणाले.
अन् राजकीय वैर संपले
दरम्यान, ठाकरे गटातून बाहेर पडून शिंदे गटाने महायुतीत प्रवेश केला. सुरुवातीचे अडीच वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्या सरकारमध्ये दीपक केसरकर मंत्री होते. यावेळी राणे आणि केसरकर यांचं राजकीय वैमनस्य संपुष्टात आली आणि दोन्ही नेत्यांमध्ये दिलजामाई झाली. त्यानंतर केसरकर यांनी नेहमीच राणे यांचं कौतुक केलं. त्यांच्या कामाची पद्धती, मुख्यमंत्री म्हणून राणेंनी गाजवलेला काळ आणि राणेंचा आवाका यावर नेहमीच केसरकर भरभरून बोलत राहिले. कोणत्याही वादात जाणार नाही याची काळजी केसरकर यांनी घेतली. त्याला राणेंनीही चांगला प्रतिसाद दिला. याशिवाय राणेंच्या दोन्ही मुलांसोबतचं राजकीय वैमनस्यही केसरकर यांनी संपुष्टात आणलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर केसरकर यांनी राणे यांना लोकसभा निवडणुकीला उभं राहण्याचा आग्रह धरला. राणेंनीही सर्वांच्या आग्रहाखातर निवडणूक लढवून विजय मिळवला.