Ramdas Kadam : मनोज जरांगे पाटील यांच्यावर रामदास कदम यांचा गंभीर आरोप; मराठा आंदोलकांमध्ये खळबळ
मनोज जरांगे पाटील यांच्यावर छगन भुजबळ आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केल्यानंतर आता या वादात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उडी घेतली आहे. रामदास कदम यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावरच संशय घेतला आहे.
कृष्णकांत साळगावकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, चिपळूण | 22 ऑक्टोबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण केलं. प्राण पणाला लावले आणि सरकारला समिती नेमण्यासाठी भाग पाडलं. सरकारनेही येत्या 24 ऑक्टोबरपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय घेणार असल्याचं आश्वासन जरांगे पाटील यांना दिलं आणि त्यानंतर जरांगे यांनी उपोषण सोडलं. मात्र, आता या उपोषणावरच संशय व्यक्त केला जात आहे. थेट शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
रामदास कदम यांनी मीडियाशी संवाद साधताना हा गंभीर आरोप केला आहे. राज्य सरकारला अडचणीत आणण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे प्रयत्न आहेत. जरांगे पाटील यांच्या उपोषणामागे राजकीय शक्तीचा हात आहे, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे. कुणबी आणि मराठा यांच्यात रोटीबेटी व्यवहार होत नाही, हे जरांगे पाटील यांना माहीत नाही. कोकणातील कुणबी वेगळा आहे. त्यामुळे मी जरांगे पाटील यांच्या मागणीच्या विरोधात आहे. कुणीही मराठा कुणबी असल्याचं प्रमाणपत्र घेणार नाही, असं रामदास कदम यांनी सांगितलं.
तर आरक्षण मिळू शकतं
मराठा समाज किती मागासलेला आहे याचा सर्व्हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आणि सर्वोच्च न्यायालयाला ते पटलं तर मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं, असं सांगतानाच मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या व्यक्तींचा सर्व्हे केला तर आत्महत्या केलेल्या व्यक्ती या मराठा समाजाच्या असल्याचंच दिसून येईल, असंही त्यांनी सांगितलं.
कोर्ट सातत्याने आदेश देतंय
यावेळी त्यांनी आमदारांच्या अपात्रतेवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. न्यायालयाने विधिमंडळाच्या कामांमध्ये कधीही हस्तक्षेप केला नव्हता. सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांना सातत्याने आदेश देत आहे. जो काही निकाल येईल तो येईल. निकाल माहीत असायला किंवा त्याचं भाकीत करायला माझं आडनाव काय जोशी नाही. किंवा मी ज्योतिषीही नाही, असं कदम म्हणाले.
हा महाराष्ट्र आहे, बिहार नाही
उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागला तर एकनाथ शिंदे सर्वोच्च न्यायालयात जातील आणि एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल लागला तर उद्धव ठाकरे न्यायालयात जातील. जो निर्णय निवडणूक आयोगाने घेतला तोच निर्णय जर अध्यक्षांनी घेतला तर उद्धव ठाकरे यांचे आमदार अपात्र होतील. अध्यक्षांच्या कामात कोणी हस्तक्षेप करू नये. हा महाराष्ट्र आहे, बिहार नाही, असंही त्यांनी सुनावलं.