समीर वानखेडे सीबीआय चौकशीपासून तुर्तास वाचले, नेमकं घडलं काय?

समीर वानखेडे यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. समीर वानखेडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. समीर वानखेडे यांची उद्या सीबीआय चौकशी होणार होती. पण त्यांची चौकशी तुर्तास थांबली आहे. त्यामागील महत्त्वाचं कारणही समोर आलं आहे.

समीर वानखेडे सीबीआय चौकशीपासून तुर्तास वाचले, नेमकं घडलं काय?
| Edited By: Chetan Patil | Updated on: May 17, 2023 | 10:11 PM

मुंबई : एनसीबीचे मुंबई झोनलचे माजी डायरेक्टर समीर वानखेडे यांना दिल्ली हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. समीर वानखेडे यांच्याविरोधात सीबीआयचा तपास सुरु आहे. आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे यांनी 25 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा गंभीर आरोप समीर वानखेडे यांच्यावर आहे. याशिवाय वानखेडे यांच्यावर आणखी काही गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत. या प्रकरणी सीबीआयकडून कारवाई सुरु आहे. सीबीआयने नुकतंच वानखेडे यांच्या घरावर छापा टाकला होता. तसेच त्यांना उद्या चौकशीसाठी बोलावलेलं. पण त्यांची ही चौकशी दिल्ली हायकोर्टाच्या आदेशामुळे तुर्तास रोखण्यात आली आहे.

सीबीआयने समीर वानखेडे यांना समन्स बजावले होते. सीबीआयने वानखेडे यांना उद्या सकाळी 11 वाजता बोलावलं होतं. विशेष म्हणजे सीबीआयचं एक विशेष पथक दिल्लीतून मुंबईत समीर वानखेडे यांच्या चौकशीसाठी येणार होतं. पण दिल्ली हायकोर्टाने समीर वानखेडे यांची उद्याची चौकशी रोखली आहे. त्यामुळे वानखेडे यांना मोठा दिलासा मिळाल्याचं मानलं जात आहे.

दिल्ली हायकोर्टाचे समीर वानखेडे यांना महत्त्वाचे निर्देश

सीबीआयने आर्यन खान प्रकरणी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सीबीआयने वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. तसेच आरोपपत्रात समीर वानखेडेंनी 25 कोटींच्या खंडणीची मागणी केल्याचा उल्लेख केलाय. सीबीआयने वानखेडेंना समन्सही बजावलेलं. पण दिल्ली हायकोर्टाने वानखेडेंची चौकशी रोखली आहे.

या प्रकरणी मुंबई हायकोर्टात दाद मागण्याचे निर्देश दिल्ली हायकोर्टाने समीर वानखेडे यांना दिले आहेत. त्यामुळे समीर वानखेडे येत्या 22 मे ला मुंबई हायकोर्टात दाद मागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

समीर वानखेडे यांच्यावर नेमके आरोप काय?

समीर वानखेडेंच्या नेतृत्वात ऑक्टोबर 2021 एनसीबीनs मुंबईतल्या एका जहाजावर छापा टाकला होता. या छाप्यात ड्रग्ज घेतल्याप्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसहीत इतरांना अटक करण्यात आली होती. कोर्टात मात्र आर्यन खान आणि इतरांची निर्दोष मुक्तता झाली. एनसीबी आणि समीर वानखेडे आर्यन खानने ड्रग्स बाळगलं किंवा सेवन केल्याचा पुरावा देऊ शकले नव्हते.

कोर्टाने यावरुन समीर वानखेडेंच्या टीमवर ताशेरेही ओढले होते. यानंतर समीर वानखेडेंनी शाहरुख खानकडून 25 कोटींची खंडणी मागितली होती, असा आरोप या केसमध्ये पंच असलेल्या प्रभाकर साईल यांनीच केला. पुढच्या काही दिवसात पंच प्रभाकर साईल यांचा अचानक मृत्यू झाला. मृत्यूमागे हृदयविकाराचं कारण दिलं गेलं. नंतर समीर वानखेडेंच्या ड्रग्स छाप्यावरच्या कारवाईवरच प्रश्न उभे राहिले.

विशेष म्हणजे सीबीआयने आता जी एफआयर दाखल केलीय, त्यात समीर वानखेडेंनी सामूहिकरित्या कट रचून शाहरुख खानकडे 25 कोटींची खंडणी वसुलीचं षडयंत्र रचल्याचं म्हटलंय. शिवाय या 25 कोटीपैकी 50 लाख रुपये वानखेडे आणि इतर आरोपीना मिळाल्याचाही दावा सीबीआयने केलाय.

Follow Us