रात्रीस खेळ चाले! जयंत पाटील मध्यरात्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या बंगल्यावर, तासभर चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मध्यरात्री गुप्त भेट घेतली. तासभर चाललेल्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

रात्रीस खेळ चाले! जयंत पाटील मध्यरात्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या बंगल्यावर, तासभर चर्चा
jayant patil chandrashekhar bawankule
| Updated on: Feb 25, 2025 | 5:34 PM

Jayant Patil Meet Chandrashekhar Bawankule : राज्याच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुंबईतील बंगल्यावर मध्यरात्रीच्या सुमारास ही भेट झाली. साधारण तासभर जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात बैठक सुरु होती. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गेल्या काही दिवसांपासून भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता त्यातच जयंत पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली. जयंत पाटील हे मध्यरात्रीच्या सुमारास चंद्रशेखर बावनकुळे मुंबईतील बंगल्यावर दाखल झाले. यानंतर साधारण तासभर त्या दोघांमध्ये बैठक झाली. मध्यरात्रीच्या सुमारास ही बैठक झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा

जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. विशेष म्हणजे जयंत पाटील हे गेल्या काही दिवसांपासून सक्रीय राजकारणात पाहायला मिळत नाहीत. राज्यात विविध घटना घडत असतानाही जयंत पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे ते लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचे बोललं जात आहे.

सांगलीच्या काही महसूल प्रश्नावर निवेदन देण्यासाठी भेट

यानतंर जयंत पाटील यांनी स्वत: या बातमीला दुजोरा दिला. चंद्रशेखर बावनकुळे आणि माझी भेट झाली. या भेटीमध्ये सांगलीच्या काही महसूल प्रश्नावर मी त्यांना जवळपास दहा ते बारा निवेदने दिली. ही निवेदन देण्यासाठी त्यांची भेट मागितली होती. सातबाऱ्याचं संगणकीकरण ऑनलाईन करण्यात आलं आहे. पण त्याच्या दुरुस्त्या अनेक शेतकऱ्यांच्या वेळेवर होत नाहीत. हा सर्व महाराष्ट्राचा प्रश्न आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.