NEET-UG 2026 cancelled : आरोपीने केस कापले… 10 लाखांचा पेपर 15 लाखाला विकला? नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
NEET Paper Leak : नीट पेपरफुटीचा तपास सुरू करण्यात आला आहे. या पेपरफुटीत नाशिक कनेक्शन समोर आले आहे. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी म्हणजेच डॉक्टर होण्यासाठी असणाऱ्या नीट परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर आल्यानंतर आता ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आगामी काळात ही परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे. आता प्रशासनाने या कथित पेपरफुटीचा तपासही सुरू केला आहे. या पेपरफुटीत नाशिक कनेक्शन समोर आले आहे. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत काय घडलं? नाशिकरमध्ये काय घडलं याची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
नाशिकमध्ये काय घडलं?
3 मे रोजी होणारा NEET पेपर 1 मे रोजीच फुटला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर या पेपर फुटी प्रकरणातील आरोपी नाशिकमध्ये असल्याची राजस्थान पोलिसांनी नाशिक पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हा युवक नाशिकमध्ये राहणारा असल्याचे समोर आले. हा 30 वर्षीय संशयित आरोपी BAMS चे शिक्षण घेत होता. हा आरोपी मूळचा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील रहिवासी आहे. राजस्थान CBI कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे नाशिक गुन्हे शाखेने दुपारी बारा वाजेच्या सुमारास संशयिताला ताब्यात घेतले आहे.
आरोपीच्या भूमिकेबाबत मोठी माहिती
या आरोपीने ओळख लपविण्यासाठी केस कापले असल्याचे समोर आले आहे, त्यामुळे सुरूवातीला तो ओळखू आला नाही. मात्र क्राईम ब्रांच टीमने आरोपीला ओळखले आणि तत्काळ ताब्यात घेतले. नाव, मोबाईल नंबर आणि पत्त्याच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध घेत अटक केली. या संबंधित युवकाची मेडिकल काऊन्सेलिंग एजन्सी असल्याची माहिती मिळाली आहे. या आरोपीने पेपर इकडून तिकडे देण्यासाठी फक्त मध्यस्थाची भूमिका बजावल्याचा संशय आहे. यासाठी 10 लाखांचा पेपर 15 लाखांना विकण्याचा संशयही आहे. नंतर हा पेपर इन्स्टाग्रामवर लीक झाला. आता या प्रकरणातील आणखी लोकांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
पेपरफुटीबाबत कायदा यावा – रोहित पवार
आमदार रोहित पवार यांनी म्हटले की, NEET परीक्षेत झालेल्या घोटाळ्यामुळे पेपरफूटीचा मुद्दा पुनः चर्चेत आला आहे. या पेपरफुटीच्या प्रकरणाचे धागेदोरे नाशिक पर्यंत येऊन पोहचल्याने महाराष्ट्राची मोठी बदनामी होत आहे. NEET घोटाळ्यामुळे देशभरातील 24 लाख विद्यार्थ्यांना फटका बसला असून यामध्ये महाराष्ट्रातील 2.25 लाख विद्यार्थी आहेत.
2023 मध्ये युवा युवा संघर्षयात्रेच्या माध्यमातून पेपरफुटी विषयी कायदा आणण्याची मागणी केली होती. केंद्र सरकारने मसुदा दिल्यानंतर राज्य सरकारने कायदा देखील केला होता. परंतु त्या कायद्यात अनेक त्रुटी राहिल्या होत्या. त्या त्रुटी दूर करण्यासाठी मी विधानसभेत विधेयक देखील मांडलेले आहे, परंतु दुर्दैवाने त्यावर वेगाने कारवाई होत नाही. येणाऱ्या अधिवेशनात या महत्वपूर्ण विधेयकावर कार्यवाही व्हावी, ही अपेक्षा !