Ajit Pawar: तर राज ठाकरेंनी शरद पवारांना जातीयवादी म्हटले असते का?; अजित पवार असं का म्हणाले?

| Updated on: Apr 28, 2022 | 5:42 PM

Ajit Pawar: राज्यात सलोखा राहावा यासाठी राज्यसरकारने सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती.

Ajit Pawar: तर राज ठाकरेंनी शरद पवारांना जातीयवादी म्हटले असते का?; अजित पवार असं का म्हणाले?
तर राज ठाकरेंनी शरद पवारांना जातीयवादी म्हटले असते का?; अजित पवार असं का म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी राष्ट्रवादीविरोधात (ncp) आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज ठाकरे यांनी तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जातीयवादीही म्हटले आहे. त्यामुळे मनसे आणि राष्ट्रवादीत संघर्ष निर्माण झाल्याचं चित्रं असतानाच राष्ट्रवादीचीच मनसेला फूस असल्याने राज ठाकरे पवारांवर टीका करत आहेत, अशीही चर्चा रंगली आहे. मात्र, या चर्चांना खुद्द राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी पूर्णविराम दिला आहे. मनसेला राष्ट्रवादीची फूस असती तर राज ठाकरेंनी पवारसाहेबांना जातीयवादी म्हटले असते का? राज ठाकरे आज भाषणे करत असताना ते भाजपवर टीका करत नाहीत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरच टीका करतात, असं अजित पवार म्हणाले. राज यांचा लोकसभेला अजेंडा वेगळा होता. त्यावेळी त्यांनी फक्त भाजपला टार्गेट केले होते. ही वस्तूस्थिती मान्य करावी लागेल. 2019 ला आघाडीला अप्रत्यक्ष फायदा होईल, अशा पद्धतीने त्यांनी सभा घेतल्या होत्या याची आठवणही अजित पवार यांनी करुन दिली.

अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन हा सवाल करत मनसे-राष्ट्रवादीच्या छुप्या युतींना पूर्णविराम दिला. राज्यात सलोखा राहावा यासाठी राज्यसरकारने सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. मनसे सोडून सर्व पक्षांनी एकत्र भूमिका घेतलेली आहे. भाजपने तर बैठकीवर बहिष्कार टाकला होता. सुप्रीम कोर्टाने लाऊडस्पीकरबाबत आधीच नियमावली दिलेली आहे. उद्या जर एखादा निर्णय घ्यायचा असल्यास सर्वांसाठी एकच कायदा करावा लागेल. योगींनी उत्तरप्रदेशमध्ये काय करावे, हा त्यांचा अधिकार आहे. आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्र सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन जाणारा आहे, असा टोला अजित पवार यांनी भाजपला लगावला.

भाजपला कुणी थांबवले होते?

यावेळी भोंग्याच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजपलाही फटकारले. इतके वर्ष सर्व चालत आलेले आहे. आतापर्यंत भाजपला कुणी थांबवले होते? आजच ही मागणी का केली जात आहे? उद्या सुप्रीम कोर्टाने काही आदेश काढला तर सर्व धर्माच्या भाविकांना तो निर्णय लागू होईल, याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे. भारतातील महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात जातीय दरी निर्माण करुन आज जातीय सलोखा बिघडवण्याचे काम सुरु आहे. नको त्या गोष्टी लोकांच्या मनात आणून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्राला परवडणारा नाही, सर्वांनी गांभीर्याने या गोष्टी घेऊन मनाचा मोठेपणा दाखवावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

अशा घटना भारतभर घडत असतात

2014 च्या निवडणुकीत नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार होत्या. त्यांचे पती रवी राणा हे राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार होते. 2019 ला पुन्हा रवी राणा आणि नवनीत राणा हे राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार होते. 2019 ला नवनीत राणा यांना पक्षाने तिकीट दिलेले नव्हते. ज्यांना आपण पुरस्कृत करतो, ते आपल्यासोबतच राहतील का? हे तपासण्याचे आपल्याकडे अजून तरी यंत्र नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे एकत्र सरकार येईल असे कुणालाच वाटले नव्हते. एकेकाळी ममता बॅनर्जी आणि भाजप एकत्र होते, आज ममतादीदी भाजपच्या विरोधक आहेत. बिहारमध्ये नितीश कुमार कधी भाजपसोबत असतात कधी भाजपचे विरोधक होतात. त्यामुळे अशा घटना आपल्या इथेच नाही, तर भारतभर घडत असतात, असेही ते म्हणाले.