Power Outage In Thane: दादर, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरमध्ये बत्तीगुल; राज्यपालांच्या कार्यक्रमालाही फटका

| Updated on: Apr 26, 2022 | 11:34 AM

Power Outage In Thane: गेल्या अर्धा तासापासून या परिसरातील वीज गायब झाली असून त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे.

Power Outage In Thane: दादर, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरमध्ये बत्तीगुल; राज्यपालांच्या कार्यक्रमालाही फटका
दादरसह आजुबाजुच्या परिसरात काही काळ वीजपुरवठा खंडीत, आता पुन्हा सुरळीत
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

समीर भिसे, ठाणे: पडघा (padgha) येथील वीज वितरण केंद्रात बिघाड झाल्याने दादरसह (dadar) ठाणे, पालघर, नालासोपारा, नवी मुंबई, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगरात वीज पुरवठा खंडित झाला आहे. गेल्या अर्धा तासापासून या परिसरातील वीज गायब (Power Outage) झाली असून त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे. तसेच हा वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी अजून एक ते दीड तास लागणार असल्याची प्राथमिक माहिती महावितरणने दिली आहे. याशिवाय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दादर येथील एका कार्यक्रमातही तब्बल अर्धा ते पाऊण तास वीज पुरवठा खंडित झाला होता. मात्र, कार्यक्रम सुरू होण्यास उशीर होता. दरम्यान, अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने ठाणे जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे आधीच कडाक्याचा उकाडा आणि त्यात वीज गेल्याने येथील नागरिक चांगलेच हैरान झाले होते.

पडघा मेन लाईन ट्रिप झाल्यामूळे ठाण्यातील घोडबंदर रोड, पाचपाखाडी, नौपाडा, पालघर, नालासोपार, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, नवी मुंबई, नेरूळ, जुई नगर आदी ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाला होता. पडघ्याच्या महापारेषण उच्चदाब वाहिनीमध्ये बिघाड झाल्याने संपूर्ण पालघर विभागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. पडघा येथून ठाणे जिल्ह्याला प्रामुख्याने वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे पडघ्याच्या मेन लाईनमध्ये ट्रिप झाल्याने हा भाग गेल्या अर्धा ते पाऊणतासापासून अंधारात गेला आहे. या भागातील वीज पुरवठा सुरू होण्यास तास ते दीड तास लागणार आहे. तर, नवी मुंबईतील वीज पुरवठा सुरू झाल्याचं सांगण्यात येतं.

वाडा, वसईतही बत्तीगुल

वसई, वाडासह भावेघर या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. सकाळी 10 वाजल्यापासून वसई, विरार, नालासोपारा परिसरातील अनेक भागात वीज गायब आहे. 220 KV वसई, 100 केव्ही वसई, 220 केव्ही वाडा, 220 केव्ही भावेघर या परिसरातील सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झालेने वीज पुरवठा खंडित झाला आहे. तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू असल्याची माहिती वसईचे अधीक्षक अभियंता यांनी दिली आहे. मात्र, खंडित झालेला वीजपुरवठा कधी पर्यंत सुरळीत होईल हे स्पष्ट नाही.

राज्यपालांच्या कार्यक्रमात अंधार

पडघा येथील मेन लाईन ट्रिप झाल्याने त्याचा फटका राज्यपालांच्या कार्यक्रमालाही बसला आहे. दादर येथे पडघ्यातून 400 केव्हीचा वीज पुरवठा होतो. पण पडघ्यातील विद्यूत केंद्रातील बिघाडाचा दादरलाही फटका बसला. दादरच्या महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स गाईड्सच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होता. राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात येणार होते. मात्र, वीज पुरवठा खंडित झाल्याने कार्यक्रम उशिराने सुरू झाला.