Omicron Variant : राज्यात ओमिक्रॉनचा फैलाव चिंताजनक, नवीन 8 रुग्ण आढळले, एकूण रुग्णांची संख्या 48 वर

| Updated on: Dec 18, 2021 | 8:22 PM

राज्यात आज सापडलेल्या एकूण 8 रुग्णांपैकी 4 रुग्ण हे मुंबई विमानतळ कार्यक्षेत्रातील तीन रुग्ण सातारा तर एक रुग्ण पुण्यातील असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. इतर तीन रुग्ण हे छत्तीसगड, केरळ आणि जळगावचा रहिवासी आहेत. साताऱ्यातील 3 जणांनी दक्षिण आफ्रिकेचा प्रवास केला होता. या तीन जणांपैकी एक रुग्ण 8 वर्षाची मुलगी आहे.

Omicron Variant : राज्यात ओमिक्रॉनचा फैलाव चिंताजनक, नवीन 8 रुग्ण आढळले, एकूण रुग्णांची संख्या 48 वर
कोरोना विषाणू
Follow us on

मुंबई : राज्यात ओमिक्रॉनचा (Omicron) फैलावर चिंतेची बाब ठरताना पाहायला मिळत आहे. कारण, राज्यात आज ओमिक्रॉनची लागण झालेले 8 नवे रुग्ण (Corona Patient) आढळून आले आहेत. त्यामुळे आता ओमिक्रॉनची बाधा झालेल्या राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 48 वर पोहोचली आहे. त्यामुळे राज्यात ओमिक्रॉनचा संसर्ग वाढताना पाहायला मिळत आहे. तर आतापर्यंत 28 रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडून देण्यात आलं आहे.

राज्यात आज सापडलेल्या एकूण 8 रुग्णांपैकी 4 रुग्ण हे मुंबई विमानतळ कार्यक्षेत्रातील तीन रुग्ण सातारा तर एक रुग्ण पुण्यातील असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. इतर तीन रुग्ण हे छत्तीसगड, केरळ आणि जळगावचा रहिवासी आहेत. साताऱ्यातील 3 जणांनी दक्षिण आफ्रिकेचा प्रवास केला होता. या तीन जणांपैकी एक रुग्ण 8 वर्षाची मुलगी आहे.

‘आज पुन्हा एकदा मुंबईत एकाही मृत्यूची नोंद नाही’

तर दुसरीकडे दिलासादायक बातमी अशी आहे की, आज पुन्हा एकदा मुंबईत एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. मार्च – 2020 मध्ये कोविड-19 चा प्रसार सुरु झाल्यानंतर यापू्र्वी 17 ऑक्टोबर 2021 ला पहिल्यांदा मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर सध्या सुरू असलेल्या डिसेंबर महिन्यात आतापर्यंत तिसऱ्यांदा मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झालेली आहे. या महिन्यात यापूर्वी 11 डिसेंबर आणि 15 डिसेंबरला शून्य मृत्यूची नोंद झालेली होती.

मुंबई महापालिकेकडून नव्या सूचना जारी

ओमिक्रॉनचा संसर्ग जगभरात वेगाने फैलावत असून त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण होऊ लागला आहे. कोविडची तिसरी लाट येऊ नये म्हणून शासन आणि प्रशासन वारंवार आवाहन करत असतानाही त्याचे बहुतांश ठिकाणी योग्यरित्या पालन केले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. विशेषतः लग्न समारंभ आणि इतर समारंभांमध्ये नियम मोडले जात असल्याचे आढळते आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी शासनाने आखून दिलेल्या मर्यादांचे योग्य पालन करावे, कोणत्याही प्रकारची गर्दी टाळावी, मास्क लावण्यासह कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, प्रत्येकाने लसीकरण पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहन महानगरपालिका इकबाल सिंह चहल यांनी केले आहे. या नियमांची पायमल्ली करणऱ्यांवर महानगरपालिकेच्या विभाग कार्यालय स्तरावरील पथकांकडून तसेच पोलीस प्रशासनाकडून सक्त कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

या सूचनांचे पालन करा

>> बंदिस्त सभागृहांमध्ये आयोजित होणारे कोणतेही कार्यक्रम / समारंभ / उपक्रम या ठिकाणी, त्या सभागृहाच्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के व्यक्तिंनाच उपस्थितीची परवानगी आहे.
>> मोकळ्या / खुल्या जागेत होणाऱ्या कार्यक्रम / समारंभ / उपक्रमासाठी सदर जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के एवढ्याच संख्येने उपस्थितीला परवानगी असेल.
>> मात्र, खुल्या / मोकळ्या जागेतील कोणत्याही आयोजनात एक हजारापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येणार असतील तर, त्या संदर्भात स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला आगावू सूचना देऊन त्याबाबतची पूर्व मंजुरी प्राप्त करणे अत्यावश्यक आहे.
>> सर्व हॉटेल्स्, उपहारगृह, सिनेमागृह, इतर सर्व शासकीय व खासगी आस्थापना आदी सर्व ठिकाणी उपस्थितींच्या नियमांसह कोविड प्रतिबंधात्मक निर्देशांचे सक्तीने पालन करण्यात यावे.
>> सर्व पात्र नागरिकांनी कोविड लसीचे दोन्ही डोस घेऊन आपले लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह इतर सार्वजनिक ठिकाणी देखील कोविड लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच योग्य ती मुभा असेल. अन्यथा नियमानुसार कारवाई केली जाईल.
>> सार्वजनिक ठिकाणी / आस्थापनांमध्ये कार्यरत सर्व मनुष्यबळाचे तसेच कार्यक्रम / समारंभांमध्ये सर्व उपस्थितांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. त्याचे उल्‍लंघन केल्याचे आढळले तर संबंधित आस्थापनांवर नियमानुसार योग्य ती दंडात्मक कारवाई केली जाईल.
>> मुखपट्टी (मास्क) चा योग्यरितीने वापर करणे, हातांची नियमित स्वच्छता राखणे आणि सुरक्षित अंतर राखणे, सर्व परिसर / खोल्या / >> प्रसाधनगृहे यांची वेळोवेळी स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करणे यासह कोविड प्रतिबंधक सर्व बाबींचे प्रत्येक नागरिकाकडून काटेकोर पालन करण्यात यावे.
>> नाताळ (ख्रिसमस), नवीन वर्ष स्वागतासाठी पार्ट्यांचे आयोजन करणे टाळावे, समारंभांमध्ये गर्दी करु नये, कोविड प्रतिबंधात्मक वर्तन राखावे, असे आवाहन पुनश्चः एकदा इकबाल सिंह चहल यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे.

इतर बातम्या :

‘तुमचा वापर संपतो तेव्हा तुम्हाला च्युइंगमसारखं थुंकलं जातं’, रामदास कदमांवरुन नितेश राणेंचा शिवसेनेवर निशाणा

Video : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरणानंतर शिवसेना आक्रमक, भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन, कर्नाटक सरकारला इशारा