या राष्ट्रीय महामार्गावरून वाहते चार फूट पाणी, अनेक भागांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला

विदर्भात पावसाने चांगलाच मुक्काम ठोकला. गेल्या तीन-चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे.

या राष्ट्रीय महामार्गावरून वाहते चार फूट पाणी, अनेक भागांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Jul 21, 2023 | 3:34 PM

गडचिरोली : विदर्भात पावसाने चांगलाच मुक्काम ठोकला. गेल्या तीन-चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे नागरिकांची त्रेधातीरपट उडत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दुपारपासून पावसाचा जोर वाढला आहे . हवामान खात्याने चंद्रपूरसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. भंडारा जिल्ह्यात कालपासून काही ठिकाणी मध्यम तर रिमझिम पाऊस बरसत आहे. त्यामुळे जिल्ह्यात येलो अलर्ट सुद्धा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील आलापली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग नंदिगावपासून पूर्णपणे बंद झाला. नंदिगाव येथून राष्ट्रीय महामार्गावर तीन ते चार फूट पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा फटका सर्वात जास्त बसला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील पेरमिली आणि आसरअली या भागात 185 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. असाच पाऊस सुरू राहिला तर जिल्हा मुख्यालयातील अनेक भागांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे.

बंद झालेल्या रस्त्यांची नावे

1. सिडकोंडा -झिंगानूर (स्थानिक नाला)

2. कोत्तापल्ली र. – पोचमपल्ली (स्थानिक नाला)

3. आसरली – मुतापुर- सोमणूर (स्थानिक नाला)

4. मौशीखांब – अमीर्झा (स्थानिक नाला)

5. साखरा – चूरचूरा (स्थानिक नाला)

6. कुंभी – चांदाळा (स्थानिक नाला)

7. रानमूल – माडेमूल (स्थानिक नाला)

8. आलापल्ली- सिरोंचा रा.म.मा (कासरपल्ली नाला)

9. कान्होली -बोरी-गणपूर (कळमगाव नाला)

10. चामोर्शी- कळमगाव (स्थानिक नाला)

11. चांभार्डा- अमिर्झा (पाल नाला)

नदीकाठावर राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या आठवड्यापर्यंत केवळ अठरा टक्के पावसाची नोंद झाली होती. मात्र ती आजच्या दिवसापर्यंत सरासरीच्या 38 टक्के एवढी झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वैनगंगा , इरई, वर्धा या नद्यांच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या रहिवाशांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील निम्न वर्धा धरणाची दारे उघडली जाणार आहेत. त्याची आवक वर्धा नदीत होऊ लागल्यावर वर्धेची पाणी पातळी वाढणार आहे. परिणामी वर्धेला जोडणाऱ्या सर्व उपनद्या देखील फुगणार आहेत. त्यामुळेच प्रशासनाने वेळीच पावलं उचलण्यास प्रारंभ केला आहे. पावसाची संततधार अशीच सुरू राहिल्यास जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वीज पडून २० मजूर जखमी

भंडारा जिल्ह्यात सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. काल सायंकाळच्या सुमारास शेतावर काम करत असताना जिल्ह्यात साकोली आणि पवनी दोन तालुक्यात वीज कोसळण्याच्या घटना घडल्या. यात साकोली येथे दोन मजूर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार साकोली येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू आहेत. पवनी तालुक्यातील चिचाळ येथे शेतात रोवणी करत असताना अचानक वीज पडली. यामधे 20 महिला-पुरुष मजूर जखमी झाले. मोठा अनर्थ टळला. त्यांना उशिरापर्यंत ग्रामीण रुग्णालय अड्याळ येथे हलविले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Follow Us