कोरोनामुळे दिंड्या, पालख्यांवर बंदी, परळीचा भक्तीमय वातावरण शांत, नागरिकांचा हिरमोड

| Updated on: Jul 05, 2021 | 9:16 AM

पायी दिंड्या, पालखी सोहळे, भजनानंद, हरिनामाच्या गजराने दुमदुमून जाणारे वातावरण हे सर्व बंद झाले. परळीत देखील हे भक्तीमय वातावरण शांत झालं आहे.

कोरोनामुळे दिंड्या, पालख्यांवर बंदी, परळीचा भक्तीमय वातावरण शांत, नागरिकांचा हिरमोड
Wari (फोटो प्रातनिधिक)
Follow us on

संभाजी मुंडे, टीव्ही 9 मराठी, बीड (परळी) : कोरोना महामारीने गेल्या दोन वर्षांपासून पंढरपूरच्या आषाढी वारीवर बंदी आली आहे. पायी दिंड्या, पालखी सोहळे, भजनानंद, हरिनामाच्या गजराने दुमदुमून जाणारे वातावरण हे सर्व बंद झाले. परळीत देखील हे भक्तीमय वातावरण शांत झालं आहे. त्यामुळे सर्वच भक्तांना आपल्या विठूरायाला भेटण्याची आस लागली आहे. (Ashadhi Wari 2021 ban on Palkhi ceremonies due to corona people missing devotional atmosphere at Parli)

परळीचा धार्मिक माहोल स्तब्ध

गेल्या कित्येक पिढ्यांपासून चालत आलेला पालखी सोहळा यंदा देखील बंद असल्यानं परळीत भाविक स्तब्ध आहेत. या दिवसातील धार्मिक वातावरण आठवून हुरहूर व्यक्त केली जात आहे. मध्यप्रदेश, विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश दिंड्या परळी मार्गे पंढरपूरकडे जातात. त्यामुळे जुलैचा पहिला आठवडा याच दिंड्या, पालख्या आणि हरिनामाच्या गजराने मंतरलेला असायचा. मात्र कोरोनामुळे दोन वर्षांपासून परळीचा धार्मिक माहोल स्तब्ध झाला आहे. त्यामुळे परळीकर भाविक एकप्रकारे वारी आणि वारकऱ्यांना ‘मिस’ करत आहेत.

नागरिकांचा हिरमोड

आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर प्रभू वैद्यनाथाच्या नगरीतून छोट्या-मोठ्या जवळपास 76 पालख्यांचे आगमन परळी शहरात होते. या पालख्यांचे स्वागत परळीचे भाविक मनोभावे करतात. तसेच भाविकांचे श्रध्दास्थान असलेले विदर्भातील संतश्रेष्ठ गजानन महाराज, संत गुलाबराव महाराज या मोठ्या पालखीचे दोन मुक्काम परळीत असतात. औ.वि.केंद्राच्या शक्तीकुंज वसाहत येथे गजानन महाराज पालखी सोहळा दाखल झाल्यापासून मोठा उत्सव सुरू होतो. तर दुसऱ्या दिवशी परळीच्या मुख्य रस्त्यावरून पालखी मार्गस्थ होते. त्यानंतर नागरिकांच्या उत्साहाला उधाण येते. मात्र हे सर्व चित्र सलग दोन वर्षांपासून थांबले आहे.

पालख्यांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी

वारकर्‍यांना अल्पोअपहार, फराळ, चहापाणी, भोजन ,संतपुजा अशी लगबग सुरू होते. दिंडीतील असलेल्या वारकर्‍यांच्या तोंडातून हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, गण-गण गणात बोते, ज्ञानोबा- तुकारामांच्या जयघोषाने वातावरण मंत्रून जाते. तालुक्यातील वडगाव दा.वसाहत येथे आगमन झाल्यापासून ते शक्तीकुंज वसाहत परळी शहरालगत तर शक्तीकुंज वसाहत येथे मुक्कामासाठी आगमन झाल्यापासून दोन दिवस भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात.

विठुरायाच्या भेटीची आस

परळी मार्गे सुमारे 76 च्यावर दिंड्यांचा वारीचा मार्ग आहे. प्रत्येकवर्षी दिंड्यांच्या संख्येत वाढ होत असते. प्रत्येक दिंडीच्या निवासाचे स्थळ हे अगोदरच निश्चित असते. तसेच मुक्कामाच्या पंगतींचेही मानकरी पूर्वनियोजित असतात. पंढरपूरकडे जाणाऱ्या अनेक दिंड्या परळी मार्गे मार्गस्थ होतात. परळी पंचक्रोशीत वारीमार्गावर या दिंड्यांचे स्वागत करण्याची मोठी परंपरा जपली गेलेली आहे. पण या सर्वांपासून वारकरी मुकला आहे. त्यामुळे आता या भक्ताला आपल्या विठुरायाच्या भेटीची आस लागली आहे.

(Ashadhi Wari 2021 ban on Palkhi ceremonies due to corona people missing devotional atmosphere at Parli)

संबंधित बातम्या :

कोल्हापूर शहरातील निर्बंध पाच दिवसांसाठी हटवले, राज्य शासनाचा निर्णय; पण पालकमंत्र्यांचं कळकळीचं आवाहन

कोरोना काळात मृत्यू झालेल्या मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मदतीचा हात, आर्थिक मदतीसह वारसांना नोकरी मिळणार

सततचं लॉकडाऊन, बिकट आर्थिक परिस्थिती, जळगावात कर्जबाजारी सलून कामगाराची आत्महत्या