सर्वे झूठ है तो अभी जो निकाल हात में आया वो क्या है?; नाथाभाऊंचा गुलाबराव पाटील यांना सवाल

| Updated on: Feb 04, 2023 | 7:27 AM

मी भाजप सोडले हेच यांना जिव्हारी लागले आहे. त्यामुळे भाजपवाले माझ्या एवढे नादी लागले. मला जेलमध्ये टाकायच्या हालचाली सुरू आहेत. तुला जेलमध्ये टाकू असं सांगितलं जात आहे.

सर्वे झूठ है तो अभी जो निकाल हात में आया वो क्या है?; नाथाभाऊंचा गुलाबराव पाटील यांना सवाल
eknath khadse
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जळगाव: राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निकालावरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. सर्व्हेवर आमचा विश्वास नाही असं गुलाबराव पाटील म्हणत होते. सर्वे झूठ है तो अभी जो निकाल हात में आया वो क्या है? असा सवाल करतानाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निकालावरून जनमत सरकारविरोधी आहे हे स्पष्ट होतंय, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. मुक्ताईनगरमध्ये मीडियाशी संवाद साधताना एकनाथ खडसे यांनी हा दावा केला.

एकनाथ खडसे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. नोकरदार आणि शिक्षक वर्गाला पूर्वीची पेन्शन योजना हवी आहे. तर विरोधी पक्षात दम नाही. आम्हीच पेन्शन योजना देऊ असं फडणवीस म्हणत होते. पण जनतेने फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवला नाही.

नागपूरची जागा मुद्दाम मतदारांनी पाडली. कारण पदवीधरांचा फडणवीस यांच्यावर विश्वास नव्हता. फडणवीस, गडकरी यांच्या बालेकिल्ल्यात विशेषत: संघाच्या बालेकिल्ल्यात भाजपने सपाटून मार खाल्ला आहे, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली.

खडसे त्यांच्या गावात एक सरपंच निवडून आणू शकत नाहीत, असं मला म्हणत होते. आता माझा फडणवीस यांना सवाल आहे. त्यांनी साधा नागपूरचा आमदार तरी निवडून आणून दाखवावा. आता त्यांच्या गावात भाजप नव्हे इतर पक्षातील लोक निवडून येत आहेत, असा चिमटा त्यांनी काढला. तसेच या पुढचं भविष्य महाविकास आघाडीचे आहे, असा दावाही त्यांनी केला.

सरकारला चिंता नाही

या महाराष्ट्रात रोजगार उपलब्ध नाही. हजारो लोक बेरोजगार आहेत. शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हजारो शेतकरी कापसाच्या भावासाठी वणवण भटकत आहेत. लाखो शेतकरी या सरकारच्या अपेक्षेवर आहेत. हे सरकार काहीतरी करेल असं त्यांना वाटत आहे.

कापसाचा भाव 13 हजारावरून 7 हजारावर आला. घरातील कापूस खराब होत चालला. ठेवलेल्या कापसामुळे घरात खाज सुटायला लागली. काय करावे अशी चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. पण हे सरकार काहीच करताना दिसत नाही, असा हल्ला त्यांनी चढवला.

ते महाजन कुठे गेले?

दहा वर्षा अगोदर गिरीश भाऊंनी कापसाला 6 हजार रुपये भाव मिळावा यासाठी आंदोलन केलं होतं आता ते महाजन कुठे आहेत? कापसाला भाव मिळण्यासाठी रस्त्यावर येणारे आता गिरीश भाऊ कुठे गेले? शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, कर्जमाफी करणारे कुठे गेले? शेतकरी सध्या हवालदिल झाला आहे, असं ते म्हणाले.

भाजप सोडली हेच चिव्हारी लागलं

मी भाजप सोडले हेच यांना जिव्हारी लागले आहे. त्यामुळे भाजपवाले माझ्या एवढे नादी लागले. मला जेलमध्ये टाकायच्या हालचाली सुरू आहेत. तुला जेलमध्ये टाकू असं सांगितलं जात आहे. तुला अटक करू असं म्हटलं जात आहे. पण मी केलं तरी काय हे आधी सांगा? चोर, लुच्चे, गुंडे तुमच्याजवळ बसतात ते तुम्हाला चालतंय आणि माझ्या मागे ईडी, सीबीआय लावता? असा सवाल त्यांनी केला.