हसन मुश्रीफ, प्रतिक पाटील लोकसभा निवडणूक लढवणार?, राष्ट्रवादीचा नवा फंडा; मोठ्या हालचालींना वेग

| Updated on: May 31, 2023 | 10:53 AM

लोकसभा निवडणुका जवळ आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीने कोल्हापुरातून हसन मुश्रीफ यांना निवडणूक मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे.

हसन मुश्रीफ, प्रतिक पाटील लोकसभा निवडणूक लढवणार?, राष्ट्रवादीचा नवा फंडा; मोठ्या हालचालींना वेग
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षात हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनेही लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस कामाला लागला आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीने नवा फंडा वापरण्याचा निर्णय घेतला आहे. दिग्गजांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा फंडा राष्ट्रवादी काँग्रेस वापरणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या हालचाली राष्ट्रवादीने सुरू केल्या आहेत.

कोल्हापूर, हातकणंगलेच्या जागांसाठी ठाकरे गटानंतर आता राष्ट्रवादीही आग्रही आहे. लोकसभेच्या दोन्ही जागा संदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईत काल सायंकाळी बैठक पार पडली. राष्ट्रवादीकडून आमदार हसन मुश्रीफ यांनाच कोल्हापुरातून लोकसभेसाठी उतरवण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. तर हातकणंगलेमधून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील आणि कर्णसिंह गायकवाड यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

कोल्हापुरात चुरशीची लढत होणार?

गेल्या तीन लोकसभा निवडणुकीत उसना उमेदवार दिल्यानेच पक्षाच नुकसान झाल्याचा बैठकीत सुर निघाला. त्यामुळे यावेळी पक्षात काम केलेल्या उमेदवाराला संधी देण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. त्यातही दिग्गजांनाच निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यावर भर देण्याचं राष्ट्रवादीत घटत आहे. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनीही निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला ही जागा सुटल्यास कोल्हापुरात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.

मुश्रीफ कडवी झुंज देणार?

दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्यावर घर आणि कार्यालयावर ईडीने छापेमारी केली होती. त्यावेळी मुश्रीफ समर्थक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतले होते. या कार्यकर्त्यांनी ईडीच्या विरोधात जोरदार आंदोलन करून संपूर्ण कोल्हापूर ढवळून काढलं होतं. यावरून कोल्हापुरात मुश्रीफ यांच्या मागे मोठा जनाधार असल्याचं सिद्ध झालं आहे. या पार्श्वभूमीवर मुश्रीफ हे लोकसभेला उभे राहिल्यास ते भाजपच्या उमेदवाराला कडवी झुंज देऊ शकतील, अशी चर्चा आहे.

शिवसेना आग्रही

दरम्यान, शिवसेनेनेही कोल्हापूरच्या जागेवर दावा सांगितला आहे. कोल्हापुरात शिवसेनेची ताकद आहे. त्यामुळे आपल्या पदरात ही जागा पडावी म्हणून शिवसेना आग्रही आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकीतच आता या जागेवर तोडगा काढला जाणार असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.