मरतानाही एकमेकांना घट्ट धरून ठेवलं, वयोवृद्ध दाम्पत्यांचा एकमेकांना बिलगलेला मृतदेह पाहून काळजात चर्रर्र

| Updated on: Jan 22, 2022 | 8:11 PM

वासुदेव भोईर यांना पायाला इजा असल्यानं आधाराशिवाय ते नीट चालूही शकत नव्हते. त्यामुळं त्यांना रिक्षेतून उडी मारणं शक्य झालं नाही. त्याचवेळी त्यांच्या पत्नी गुलाबबाई भोईर या मात्र सहजपणे रिक्षेतून बाहेर पडून स्वतःचा जीव वाचवू शकल्या असत्या. मात्र..

मरतानाही एकमेकांना घट्ट धरून ठेवलं, वयोवृद्ध दाम्पत्यांचा एकमेकांना बिलगलेला मृतदेह पाहून काळजात चर्रर्र
अंबरनाथमधील अपघात मृत्यू झालेल्या दाम्पत्याची काळीज पिळवटून टाकणारी गोष्ट
Follow us on

अंबरनाथ : अ‍ॅसिडनं (Ambarnath Accident) भरलेल्या पेटत्या ट्रकच्या धडकेत रिक्षा जळून खाक झाल्याची घटना बुधवारी अंबरनाथमध्ये घडली होती. या घटनेत रिक्षातील वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला होता. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी रिक्षेतील दाम्पत्यापैकी पत्नीला रिक्षेबाहेर उडी मारणं सहज शक्य होतं. मात्र मृत्यू समोर दिसत असतानाही तिनं पतीची साथ न सोडता बलिदान दिलं. या आधुनिक सावित्रीच्या बलिदानाची गोष्ट ऐकून सध्या अंबरनाथकर हळहळतायत. ही घटना अपघातानंतर चार दिवसांनी समोर आली असून अत्यंत हृदयस्पर्शी कहाणी ऐकून अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळलंय. अंबरनाथच्या बारकू पाड्यात राहणारे वासुदेव रघुनाथ भोईर आणि गुलाबबाई वासुदेव भोईर हे वृद्ध दाम्पत्य बुधवारी दुपारी डोंबिवलीला राहणाऱ्या आपल्या मुलीकडे रिक्षेनं निघाले होते. त्यावेळी त्यांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. मात्र मृत्यूनंतर जेव्हा त्यांचे मृतदेह समोर आले, तेव्हा ते दोघंही जण एकमेकांना बिलगलेल्याचं आढळून आलं आहे.

नेमकं काय घडलं होतं?

परिसरात राहणाऱ्या राजेश यादव याच्या रिक्षेत हे दाम्पत्य दुपारी पावणेतीनच्या सुमारास घरून निघालं. त्यांची रिक्षा आनंदनगर पोलीस चौकीच्या पुढे वालधुनी नदीच्या पुलावर आली असता समोरून एक पेटलेला ट्रक त्यांना रिक्षेच्या दिशेनं उलटा येताना दिसला. त्यामुळं वासुदेव यांनी रिक्षाचालक राजेश याला रिक्षेतून उडी मारण्यास सांगितलं. वासुदेव भोईर यांना पायाला इजा असल्यानं आधाराशिवाय ते नीट चालूही शकत नव्हते. त्यामुळं त्यांना रिक्षेतून उडी मारणं शक्य झालं नाही. त्याचवेळी त्यांच्या पत्नी गुलाबबाई भोईर या मात्र सहजपणे रिक्षेतून बाहेर पडून स्वतःचा जीव वाचवू शकल्या असत्या. मात्र समोर मृत्यू दिसत असतानाही त्यांनी पतीची साथ सोडली नाही आणि पतीसोबत बलिदान दिलं. रिक्षाचालक राजेश याच्या समोरच पेटत्या ट्रकनं रिक्षेला धडक देत रिक्षेचा चक्काचूर केला आणि रिक्षेलाही आगीच्या ज्वाळांनी वेढलं. लहानपणापासून वासुदेव भोईर यांच्याच बाजूला राहणाऱ्या राजेश यांचे अपघाताचं दृश्य आठवताना आजही अश्रू थांबत नव्हते.

एकमेकांवर प्रचंड प्रेम

आई बाबांच्या या अपघाताबाबत मृत वासुदेव भोईर यांचा मुलगा मयूर याला विचारलं असता, आईबाबांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, असं मुलगा मयूर म्हटलंय. बाबांना शारीरिक व्याधींमुळे चालता येत नव्हतं. मात्र आईला त्यावेळी सहज रिक्षातून उडी मारता आली असती. मात्र तरीही तिनं बाबांची साथ सोडली नाही, असं मयूरनं म्हटलंय.

मृतदेह एकमेकांना बिलगलेले!

सर्वात हृदयद्रावक गोष्ट म्हणजे ज्यावेळी ही रिक्षा आग विझवल्यानंतर बाहेर काढण्यात आली, त्यावेळी वासुदेव आणि गुलाबबाई यांचे मृतदेह एकमेकांना कवटाळलेल्या अवस्थेत बाहेर काढले गेले. मृतदेह वेगळे होत नसल्यानं ते तशाच अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. हे दृश्य पाहून उपस्थितांच्या काळीज पिळवटलं होतं. त्यामुळं अखेरच्या क्षणीसुद्धा पतीची साथ न सोडणाऱ्या गुलाबबाई यांना खरोखर आधुनिक सावित्री म्हणावं लागेल, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या :

कल्याण आठवडा बाजारात फेरीवाल्यांकडून हफ्ता वसुली, माजी नगरसेवकावर आरोप

नेरुळमध्ये जन्मदात्यांकडून पोटच्या पोरांची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड

हिंगोलीत पती-पत्नीच्या नात्याला काळिमा, नवऱ्यानेच घडवून आणला बायकोवर बलात्कार