Nandurbar | हा जन्म घेण्याचा प्रसंग ऐकताना त्यालाही मोठेपणी गहिवरून येईल, नंदुरबारमध्ये प्रसव वेदना सहन करणाऱ्या मातेला बांबूच्या झोळीनं तारलं

| Updated on: Jul 21, 2022 | 10:56 AM

विमल वसावे यांच्या पोटात कळा सुरू झाल्यानंतर आरोग्य सेविका आणि आशा स्वयंसेविकेने प्राथमिक उपचार केले. मात्र वेदना कमी होत नसल्याने ग्रामस्थांनी विमल वसावे यांना बांबूची झोळी तयार करून तब्बल सहा किलोमीटर डोंगरदऱ्यांमधून जीवघेणा प्रवास करत रुग्णालयात दाखल केले.

Nandurbar |  हा जन्म घेण्याचा प्रसंग ऐकताना त्यालाही मोठेपणी गहिवरून येईल, नंदुरबारमध्ये प्रसव वेदना सहन करणाऱ्या मातेला बांबूच्या झोळीनं तारलं
Image Credit source: tv9
Follow us on

नंदुरबार : सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये अजूनही पायाभूत सुविधांचा अभाव आहे. नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात रस्त्याअभावी आरोग्याच्या समस्यांना नेहमीच तोंड द्यावे लागते. मात्र जिल्ह्यातील रस्त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस विदारक होत चालली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातल्या कुवलीडांबर या गावात राहणाऱ्या विमल वसावे आणि आमीला पाडवी या दोघी गरोदर (Pregnant) असल्याने रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी रस्ता नसल्याने ॲम्बुलन्स घरापर्यंत पोहोचू शकली नाही. त्यासाठी आठ ते दहा किलोमीटर पायपीट करत रूग्णालयामध्ये जावे लागले. विमल वसावे या गरोदर महिलेच्या अचानक (Suddenly) पोटात कळा सुरू झाल्या आणि रस्ता नसल्याने त्यांना बांबूची झोळी करत रूग्णालयात दाखल केल्याची धक्कादायक घटना पुढे आलीयं.

विमल वसावे यांच्या पोटात अचानकच कळा सुरू झाल्या

विमल वसावे यांच्या पोटात कळा सुरू झाल्यानंतर आरोग्य सेविका आणि आशा स्वयंसेविकेने प्राथमिक उपचार केले. मात्र वेदना कमी होत नसल्याने ग्रामस्थांनी विमल वसावे यांना बांबूची झोळी तयार करून तब्बल सहा किलोमीटर डोंगरदऱ्यांमधून जीवघेणा प्रवास करत रुग्णालयात दाखल केले. कुवरीडांबर ते रापापुर नदी किनाऱ्यारपर्यंत या महिलेला बांबूच्या झोळीत आणण्यात आले. अशीच परिस्थिती आमीला पाडवी या महिलेची झाली होती.

हे सुद्धा वाचा

बांबूची झोळी तयार करून तब्बल सहा किलोमीटर प्रवास

जिल्ह्यातील रस्त्यांमुळे अनेक गरोदर महिलांना या समस्यांना सामोरे जावे लागते. केंद्र सरकारच्या ड्रीम प्रोजेक्ट म्हणून देशातील रस्त्याकडे पाहिले जाते. नुकताच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी देशातील हजारो रस्ते तयार केले. देशातील रस्ते हे अमेरिकेसारखे असतील अशी घोषणा केंद्र सरकारचे केली होती. मात्र, नंदुरबारसारख्या आदिवासी दुर्गम भागातील महिलांना झालेल्या समस्या पाहून खरंच रस्ते हे अमेरिकेसारख्या दर्जाचे होतील का असा प्रश्न आता जिल्ह्यातील नागरिक विचारू लागले आहेत.

सुदैवाने वसावे यांचे नशीब बलवंत

विमलबाई यांना कसबसं नदी किनाऱ्यापर्यंत आणलं आणि त्यानंतर त्यांना  आरोग्य विभागाने ॲम्बुलन्समधून तळोदा रुग्णालयापर्यंत पोहचविले आणि त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत. विमल यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र स्वातंत्र्याच्या अमृतवासापर्यंत तळोदा या तालुक्याच्या ठिकाणापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात अद्यापही रस्ता झालेला नाही. त्यामुळे आजही पायवाटेच्या माध्यमातूनच गावात येणं जाणं होत असतं. सुदैवाने वसावे यांचे नशीब बलवंत होतं म्हणून रुग्णालयापर्यंत त्या येऊ शकल्या. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.