विदर्भात अवकाळी पावसाचा मोठा फटका; उभे गहू झाले आडवे, इतर पिकेही उद्ध्वस्त

पीक वाचवण्यासाठी शेतकरी चिंतातूर झाले आहेत. आणखी दोन दिवस हवामान खात्यानं अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.

विदर्भात अवकाळी पावसाचा मोठा फटका; उभे गहू झाले आडवे, इतर पिकेही उद्ध्वस्त
| Edited By: | Updated on: Mar 17, 2023 | 11:07 AM

अकोला : विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतात असलेल्या पिकांना याचा मोठा फटका बसत आहे. गेल्या ३ दिवसांपासून हवामानात बदल झाला. ढगाळ वातावरणाने किंचितच सूर्यदर्शन होत आहे. सतत तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांची धांदल उडत आहे. सध्या गहू, हरभरा तयार झाला असून, तो शेतकऱ्यांच्या घरात येणे बाकी आहे. या अवकाळी पावसाने या पिकांची हानी होत आहे. पीक वाचवण्यासाठी शेतकरी चिंतातूर झाले आहेत. आणखी दोन दिवस हवामान खात्यानं अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.

अकोट तालुक्यात गहू झोपला

अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यातील आकोलखेड, आकोली जहाँगीर, अंबोडा, दहिखेल फुटकर, पोपटखेड शेतशिवारात मध्य रात्री पाऊस पडला. या पावसाने गव्हाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीवर आलेल्या गहू हा अवकाळी पावसाने झोपला. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. या गहू पिकामुळे शेतकऱ्यांना मोठी आशा होती. पण तेही पीक अवकाळी पावसाने हातचे उद्ध्वस्त केले आहे.

पीक वाचवण्यासाठी धावपळ

बुलढाणा जिल्ह्यात खामगाव, बुलढाणा, चिखलीसह अनेक तालुक्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झालाय. त्यामुळे हाता-तोंडाशी आलेल्या गहू, हरभरा, मका वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडू लागली आहे काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला. खामगाव शहर आणि परिसरात तर १.४ मिमी पाऊस झाल्याची नोंद स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीने केलीय.

अमरावतीतही पिकांचे नुकसान

अमरावती जिल्ह्यातही मध्यरात्री बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर, वरुड, अचलपूर, तिवसा तालुक्यात बरसल्या पावसाच्या सरी कोसळल्या. अवकाळी पावसामुळे गहू, संत्रा, कांदा, हरभरा पिकाला फटका बसत आहे.

पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा अंदाज

वर्धा जिल्ह्यात अवकाळी पाऊस, हवेचा पिकांना फटका बसलाय. वायफडसह पाऊस झालेल्या भागात हवेमुळे गहू जमिनीवर पडला आहे. तसंच सवंगणी करून ठेवलेला चणा पावसात भिजलाय. अवकाळी पाऊस, हवेमुळं पिकांचं मोठं नुकसान होत आहे. वर्धा जिल्ह्यात ढगाळी वातावरण कायम आहे. १९ मार्चपर्यंत हवामान विभागानं अवकाळी पाऊस, हवा, गार होण्याचा इशारा दिलाय. बदललेल्या वातावरणामुळं शेतकर्‍यांच्या काळजीत वाढ झालीय. गहू पिकाला फटका बसल्याची खंत वायफडचे शेतकरी ज्ञानेश्वर चौधरी यांनी व्यक्त केली.