Ajinkya Rahane: अरे मी त्याचं करिअर वाचवलं नाहीतर… अजिंक्य रहाणेचं विधान चर्चेत, यशस्वी जयस्वालबद्दल स्पष्टच म्हणाले…
अजिंक्य रहाणे आणि यशस्वी जयस्वाल यांच्यातील संबंध भारतीय क्रिकेट वर्तुळात नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. एका प्रसंगानंतर यशस्वी आणि अजिंक्य हे एकमेकांची तोंड बघत नाही असं म्हटले जाते.

अजिंक्य रहाणे आणि यशस्वी जयस्वाल यांच्यातील संबंध भारतीय क्रिकेट वर्तुळात नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. एका प्रसंगानंतर यशस्वी आणि अजिंक्य हे एकमेकांची तोंड बघत नाही असं म्हटले जाते. अलीकडेच, अजिंक्य रहाणेने 2022 च्या दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील त्या घटनेबद्दल एक महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे, जेव्हा त्याने जयस्वालला मैदानाबाहेर पाठवले होते. अजिंक्यने नुकतीच आपली निवृत्ती जाहीर केली आहे. या निवृत्तीनंतर आता त्यांनी अनेक प्रसंगावर भाष्य केले आहे. आता मुंबई क्रिकेटमधील गाजलेल्या वादावर त्यांना अखेर मौन सोडले आहे.
2022 च्या दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात, पश्चिम विभागाचा कर्णधार रहाणेने दक्षिण विभागाचा खेळाडू टी. रवी तेजाला सतत स्लेजिंग केल्यामुळे जयस्वालला मैदानाबाहेर पाठवले होते. पंचांच्या इशाऱ्यानंतरही परिस्थिती निवळत नसल्याने रहाणेने हे टोकाचे पाऊल उचलले होते. जयस्वाल त्यावेळी सतत रवी तेजाला चिथावणी देण्याचा प्रयत्न करत होता, ज्यामुळे सामन्यातील वातावरण तापले होते. फलंदाजाच्या वारंवारच्या तक्रारींनंतर रहाणेने हे पाऊल उचलले, ज्या घटनेची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती.
‘द इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या एका अलीकडील मुलाखतीत अजिंक्य रहाणे म्हणाला, “खेळात स्लेजिंग होते आणि त्यात मजा येते. पण मला वाटले की परिस्थिती हाताबाहेर जात आहे. सामनाधिकाऱ्याने चार सामन्यांच्या बंदीचे पत्र लिहिले होते. तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘हे पत्र तयार आहे, पण तुम्ही तुमच्याच खेळाडूला शिक्षा दिली असल्यामुळे, मी ते फाडून टाकत आहे. त्याने ते माझ्यासमोरच फाडून टाकले. अखेरीस, मला आनंद झाला की यशस्वीला बंदीला सामोरे जावे लागले नाही आणि तो आज भारतासाठी खेळत आहे.”
रहाणेने कबूल केले की, त्यावेळी त्याच्या निर्णयामुळे जैस्वालला वाईट वाटले असेल. कोणीही चुका करू शकतो, पण एक खेळाडू म्हणून तुम्हाला तुमच्या मर्यादेत राहावे लागते. माझ्या निर्णयामुळे त्याला वाईट वाटले असेल तर हरकत नाही, पण त्यावेळी त्याच्या कारकिर्दीसाठी तेच योग्य होते. मी त्याला फक्त काही षटके गोलंदाजी करायला, डोक्यावर बर्फ ठेवायला आणि शांतपणे परत यायला सांगितले.”
वेस्ट झोनने सामना जिंकला आणि 265 धावांच्या शानदार खेळीसाठी जैस्वालला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्यानंतर त्याने 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध भारतासाठी कसोटी पदार्पण केले. तो सध्या भारतीय कसोटी संघातील एक महत्त्वाचा खेळाडू आहे.
