समीर वानखेडेंची चौकशी करणारी टीम चुकांवर पांघरून घालणारी नसावी, जयंत पाटलांचा खोचक टोला

| Updated on: Oct 28, 2021 | 12:47 PM

एनसीबीची दिल्लीतील एक टीम समीर वानखेडेंची चौकशी करण्यासाठी आली आहे. चौकशीसाठी आलेली टीम खऱ्या गोष्टींची चौकशी करेल अशी आशा आहे. (jayant patil taunt ncb over sameer wankhede enquiry)

समीर वानखेडेंची चौकशी करणारी टीम चुकांवर पांघरून घालणारी नसावी, जयंत पाटलांचा खोचक टोला
केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशभरातल्या ओबीसींचं मोठं नुकसान केलंय
Follow us on

रत्नागिरी: एनसीबीची दिल्लीतील एक टीम समीर वानखेडेंची चौकशी करण्यासाठी आली आहे. चौकशीसाठी आलेली टीम खऱ्या गोष्टींची चौकशी करेल अशी आशा आहे. ही टीम चुकांवर पांघरून घालणार नाही अशी आशा आहे, असा चिमटा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काढला.

जयंत पाटील आज दापोलीत आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. एनसीबीची टीम वानखेडेच्या चौकशीसाठी आलीय. वानखेडेची चौकशी करतेय. वानखेडे याने घेतलेला दाखला व IRS मध्ये जो प्रवेश घेतला तो कोणत्या जातीच्या आधारावर घेतला याचं गणित लवकरच उकळेल आणि फसवणूक कुणी केली व कशी केली याचा खुलासादेखील लवकरच होईल. चौकशीसाठी आलेली एनसीबीची टीम ख-या गोष्टींची चौकशी करेल. त्यामुळे ही टिम चुकांवर पांघरूण घालण्यासाठी आली नसावी, असा टोला पाटील यांनी लगावला.

इतरांच्या मुलाबाबतही हेच घडलं असेल

नवाब मलिक हे एनसीबीच्या विरोधात पुराव्यानिशी बोलत आहेत. नागरिकांना छळण्यासाठी, बदनाम करण्यासाठी व नागरिकांना अनेक दिवस तुरुंगात ठेवण्यासाठी एनसीबीचा वापर होतोय, असा गंभीर आरोप करतानाच शाहरुख खानच्या मुलाच्या बाबतीत घडलंय आणखी इतरांच्या बाबतीतही झालं असेल. त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. नवाब मलिक हे सत्य गोष्टी समोर आणत आहेत त्या सत्य आहेत. मलिक हे वानखेडेंच्या विरोधात नाहीत. केंद्राच्या या यंत्रणा चुका करुन दिशाभूल करत आहेत. या यंत्रणांचा वापर करून नागरिकांना छळण्याचा प्रकार होतोय, असंही त्यांनी सांगितलं.

आरोप गंभीर

यावेळी त्यांनी केपी गोसावीबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. गोसावीवर काही गंभीर आरोप असल्यामुळे त्याला अटक झाली. ज्या क्रुझवर छापेमारी झाली तिथेही तो उपस्थित होता. तिथे खंडणी कशी घ्यायची याबाबत त्याच्याच सहाय्यकाने कबुली दिली आहे. हे दोन्ही आरोप गंभीर आहेत. या देशात एनसीबीचा वापर राजकीयदृष्ट्या होतोय हे दिसून येत आहे, असंही ते म्हणाले.

चव्हाणांना धाक दाखवण्याचा प्रयत्न

बुलढाणा बँकेबाबतही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सध्या काहीतरी हुडकून काढायचा असा प्रयत्न सुरू आहे. बुलढाणा बँकेने अनेक कारखान्यांना कर्ज दिली आहेत, असं त्यांनी सांगितलं. अशोक चव्हाण यांना अडचणीत आणण्याचे आणि त्यांच्यावर अंकुश ठेवायचा, भीती दाखवायची असा प्रकार सुरू आहे. त्यामुळे गुन्हेगारांऐवजी राजकीय नेत्यांवर राजकीयदृष्ट्या धाडी घातल्या जात असल्याचं राज्यातील जनतेला दिसून आलं आहे. धाडी फक्त महाराष्ट्रात होतात. महाराष्ट्रात फक्त राजकारण्यांवर होतात आणि जे भाजपमध्ये नाहीत अशांवर होतात, त्यामुळेच शांत झोप घेण्यासाठी अनेकजण भाजपमध्ये जायला लागलेत, असा चिमटा त्यांनी काढला.

जलयुक्त शिवारची चौकशी अजून संपली नाही

जलयुक्त शिवारची चौकशी अजून संपलेली नाही. ही समिती निष्कर्षाप्रत आलेली नाही. समिती निष्कर्षातप्रत आलेली नसल्याने आनंदोत्सव साजरा करण्याची गरज नाही. आमचे सरकार अन्याय करण्यासाठी नाही. जलयुक्तप्रकरणी निरपेक्षपणे करावाई करण्यात येईल. भाजपाला आनंद माणण्याची गरज काय? ते त्यामध्ये गुन्हेगार होते का? ज्यांनी दोष केला ते दोषी असतील, त्यांनी स्वत: आनंद मानण्याचे कारण काय? भाजपने जलयुक्त शिवारात स्वत:ला क्लिनचीट घेवून आनंद उत्सव साजरा करण्याची इतकी घाई कशाला? चौकशी चालू आहे. चौकशी अजून पूर्ण होणार आहे. भाजपने अजून थांबावे, अशा कोपरखळ्याही त्यांनी लगावल्या.

 

संबंधित बातम्या:

सचिन पाटील नावाने लपला, एनजीओचा पदाधिकारी असल्याचा बनाव, पुणे पोलिसांनी सांगितल्या केपी गोसावीच्या भानगडी

पुण्यापासून मुंबई, उत्तर प्रदेश ते मध्यप्रदेश, गोसावी कुठे कुठे लपला; पोलीस आयुक्तांनी सांगितलं क्रोनोलॉजी

उद्धवसाहेब, एका महिलेवरील खासगी हल्ले बाळासाहेबांना पटले असते का? क्रांती रेडकरचं मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र

(jayant patil taunt ncb over sameer wankhede enquiry)