सरणार कधी रण? मरणानंतरही जीवाची अवहेलना, अकोल्यातील धक्कादायक प्रकार

| Updated on: Jul 25, 2021 | 8:08 AM

अकोल्यातील एका गावात स्मशानभूमी नव्हती. तरीही भर पावसात अक्षरश: कंबरेएवढ्या पाण्यातून अंत्ययात्रा काढावी लागली. यावेळी वृद्ध महिलेचा मृतदेह बैलगाडीतून नेण्यात आला.

सरणार कधी रण? मरणानंतरही जीवाची अवहेलना, अकोल्यातील धक्कादायक प्रकार
मरणानंतरही जीवाची अवहेलना, अकोल्यातील धक्कादायक प्रकार
Follow us on

अकोला : राज्यातील विविध भागामध्ये पावसाने गेल्या दोन दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. रत्नागिरी, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर या राज्यांमध्ये तर प्रचंड भयानक परिस्थिती बघायला मिळाली. या घटना ताज्या असताना अकोल्यातील नागरिकांनाही पावसाचा फटका बसला आहे. विशेष म्हणजे अकोल्यातील एका गावात स्मशानभूमी नव्हती. तरीही भर पावसात अक्षरश: कंबरेएवढ्या पाण्यातून अंत्ययात्रा काढावी लागली. यावेळी वृद्ध महिलेचा मृतदेह बैलगाडीतून नेण्यात आला.

नेमकं प्रकरण काय?

अकोला जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. या धुवाँधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत अकोला जिल्हातल्या अकोट तालुक्यातील मुंडगाव जवळील अमिनापूर येथे एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. अमिनापूर वासियांना स्मशानभूमी नसल्यामुळे त्यांना अक्षरशः कंबरेएवढ्या पाण्यातून बैलगाडीतून मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेला मुंडगाव येथील स्मशानभूमी येथे आणावं लागलं आहे. त्यामुळे मरणानंतरही जीवाची अवहेलना होताना इथे पाहायला मिळाली.

गावकऱ्यांची स्मशानभूमीसाठी मागणी

अमिनापूर येथील नागरिकांचं म्हणणे आहे की, त्यांनी प्रशासनाकडे स्मशानभूमीसाठी अनेकवेळा मागणी केली. पण प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे नेहमी दुर्लक्ष केलं. नेतेमंडळींकडून फक्त आश्वासने दिली जातात. मात्र अजूनही अमिनापूर गावामध्ये स्मशानभूमी तयार करण्यात आलेली नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून पन्नास ते साठ वर्ष झाले. पण आमिनापूर गावाला स्मशानभूमी लाभली नाही. त्यांना पावसाळ्यात याचा अतोनात त्रास सहन करावा लागत आहे.

पुरामुळे आठ-नऊ गावांचा संपर्क तुटला

अकोट तालुक्यातील मूडगाव या गावातील चंद्रिका नदीला पूर आला आहे. त्यामुळे तिथल्या आजूबाजूच्या 8 ते 9 गावांचा संपर्क तुटला आहे. त्यात असा आकस्मित मृत्यू झाल्यास नागरिकांनी काय करावं? त्यात नदी-नाल्यांना आलेला पूर, गावकऱ्यांसमोर कोणताही पर्याय उरत नाही. अशावेळी गावकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्याचीच प्रचिती नुकतीच आली आहे. गावकऱ्यांना चक्क पावसात कंबरेएवढ्या पाण्यातून बैलगाडीत मृतदेह टाकून न्यावा लागला. तिथल्या नागरिकांनी स्मशानभूमीसाठी प्रशासनाकडे अनेकदा मागणी केली आहे. या घटनेनंतर आता तरी प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे डोळे उघडतील का? हे पाहणं गरजेचं आहे.

हेही  वाचा : VIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो, गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली