तळीरामांचा शाळेच्या आवारात दारु पिऊन धिंगाणा; दारुच्या बॉटल्या शाळेतच ठेवल्या

| Updated on: Mar 10, 2023 | 2:28 PM

विद्यालय आणि अंगणवाडी या दोन ठिकाणी दारु पिणाऱ्यांनी उच्छाद मांडला. दारुच्या बॉटल्या गोळा करण्याचं काम शिक्षण किंवा अंगणवाडी सेविकांना करावं लागते.

तळीरामांचा शाळेच्या आवारात दारु पिऊन धिंगाणा; दारुच्या बॉटल्या शाळेतच ठेवल्या
Follow us on

सांगली : जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील आळसंद हायस्कूलमध्ये धक्कादायक प्रकार घडला. चक्क धुलिवंदन दिवशीच तळीरामांनी शाळेच्या आवारातच दारू पिऊन धिंगाणा घातला. चक्क दारू पिऊनच त्या बाटल्या शाळेसमोरच ठेवल्या. त्यामुळे गावकरी या प्रकाराने चांगलेच संतापले आहेत. त्यांनी घडलेल्या या प्रकाराबाबत तीव्र निषेध केला. विटा पोलिसांत याबाबत तक्रार दिली आहे. श्रीनाथ विद्या मंदिर येथे हा प्रकार घडला. पाटील सर यांनी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना हा प्रकार सांगितला. गावकरी येथे गेले. त्यांनी प्रत्येक्ष शाळेच्या आवारात दारुच्या बॉटल्यांचा खच बघीतला. त्यामुळे त्यांचा पारा चांगलाच तापला. हे तळीराम कोण याचा शोध घेण्याचे ठरवण्यात आले. यावेळी गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

मद्यपींवर कारवाई करण्याची मागणी

विद्यालय आणि अंगणवाडी या दोन ठिकाणी दारु पिणाऱ्यांनी उच्छाद मांडला. दारुच्या बॉटल्या गोळा करण्याचं काम शिक्षण किंवा अंगणवाडी सेविकांना करावं लागते. गावकऱ्यांनी पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार दिली. मद्यपींवर लवकर कारवाई करावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

दरवाज्यातच केली लघुशंका

दारु पिऊन तिथचं लघुशंका केली गेल्याचंही निदर्शनास आलं. या मद्यपींना लघुशंका कुठं करायची याचंही भान राहत नाही. शाळेच्या दरवाज्यातच काही समाजकंटक लघुशंका करतात. त्यावर नियंत्रण असावं. शिक्षण हे पवित्र कार्य मानल्या जाते. अशा पवित्र ठिकाणी काही समाजकंटक अशी अवैध काम करतात. अशा समाजकंटकांवर पोलीस त्वरित कारवाई करतील, अशी अपेक्षा असल्याचं गावकरी सांगतात.

कुठं घडली घटना

दारु पिऊन धिंगाणा घातल्याची घटना खानापूर तालुक्यातील आळसंद हायस्कूलमध्ये घडली. या घटनेमुळे शाळेतील शिक्षकांना धक्काचं बसला. त्यांनी थेट गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना बोलावलं. तळीरामांनी शाळेच्या आवारातच दारू पिऊन धिंगाणा घातला होता. शिवाय अंगणवाडी परिसरात काही मद्यपी बसले होते. या प्रकरणाची तक्रार करण्यात आली आहे. आता पोलीस मद्यपींना शोधण्यात कितपत यशस्वी ठरतात, त्यावर कारवाईची दिशा ठरणार आहे.