सातारा : सातारा जिल्ह्यात (Satara heavy Rain) मुसळधार पाऊस पडलाय. परिणामी ओढे नदी नाले तुडूंब भरुन वाहू लागलेत. प्रतापगड (Pratapgad) जवळच्या कोयना नदीवरचा पूल पाण्याखाली गेलाय. त्यामुळे 12 गावांचा संपर्क तुटलाय.
सलग तीन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागलेत. महाबळेश्वर जवळच्या चतुरबेट येथील कोयना नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने या भागातील 12 गावांचा संपर्क तुटला आहे. पुलावरून वाहतूक बंद झाल्याने चतुरबेट, खरोशी, रेनोशि, दाबे, शिरनार आदी मोठ्या गावांचा संपर्क तुटला आहे.
पश्चिम भागात दळणवळणासाठी हा पूल महत्त्वाचा असून दोन्ही पूल पाण्याखाली गेल्याने या भागातील वाहतूक ठप्प झाली आहे. या भागात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे परिणामी नद्या, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. अनेक रस्ते, पूल पाण्याखाली जात आहेत. त्यामुळे दळणवळणाचा प्रश्न उद्भवत आहे.
मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि पुण्यातील घाट माथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे तर दुसरीकडे कोलहापुरच्या घाट क्षेत्रातही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
पुण्यात येत्या 30 ते 35 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. किनारपट्टीवरच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रावरून येणाऱ्या ढगांचा प्रवास पुण्याच्या दिशेने संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यात पुढील 48 तासात काही भागात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याच्या वतीने देण्यात आलाय.
गेली दोन दिवस पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच सकाळपासून आकाश ढगाळ वातावरण होतं. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. आज दुपारनंतर शहरात मध्यम पावसाला सुरुवात झालीये. याच मध्यम स्वरुपाच्या पावसाचं रुपांतर मुसळधार पावसात होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याच्या वतीने देण्यात आलाय.
(Satara heavy Rain near Pratapgad Bridge Under Water 12 Village lost Contact)
हे ही वाचा :
पुण्यात पुढील 48 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा