जमिनीवर पाय ठेवून वागायचं असतं; शरद पवार यांनी दिल्या शिंदे-फडणवीस सरकारला कानपिचक्या
हा काही काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम आहे असं स्वरुप त्यांनी ठेवलं नाही. त्यांनी सर्व पक्षांना सोबत घेतलं. आमचे सहकारीही गेले. तिथे राष्ट्रवादीचेनेतेही गेले.
कोल्हापूर: विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात टाकण्याच्या धमक्या देणाऱ्या सत्ता पक्षातील नेत्यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खडेबोल सुनावले आहेत. सत्ता हातात आल्यानंतर जमिनीवर पाय ठेवून काम करायचं असतं. पण सत्ता पक्षातीलच काही लोक विरोधकांना धमकावत आहेत. तुरुंगात टाकण्याच्या, जामीन रद्द करण्याच्या धमक्या देत आहेत. ही राजकीय नेत्यांची कामे नाहीत. काही लोक टोकाची भूमिका घेत आहेत. ते योग्य नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वीच राममंदिर उभारण्यात येणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. शाह यांच्या विधानाची पवार यांनी खिल्ली उडवली. देशाच्या गृहमंत्र्यांचा विषय आहे की नाही माहीत नाही. राम मंदिराच्या पूजाऱ्याने सांगितलं असतं तर बरं झालं असतं. पूजाऱ्यांची जबाबदारी ते घेत आहेत. लोकांच्या प्रश्नावरून लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी हे विषय काढले जात आहे, असा टोला शरद पवार यांनी लगावला.
बिहारमध्ये जातीयनिहाय गणना केली जात आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या या निर्णयाचं पवार यांनी स्वागत केलं. जातीय निहाय जनगणना करावी अशी आमची आधीपासूनची मागणी आहे. प्रत्येक जातीची संख्या काय आहे? हे समजण्यासाठी त्यांचं मोजमाप झालं पाहिजे. या लोकांच्या विकासासाठी काही केलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. त्यामुळे नितीश कुमार यांच्या निर्णयाचं स्वागत आहे, असंही ते म्हणाले.
यावेळी राहुल गांधी यांच्या रॅलीला वाढत्या प्रतिसादावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राहुल गांधींची सत्ताधारी पक्षांनी टिंगलटवाळी करण्याचा प्रयत्न केला होता. तो कार्यक्रम हाती घेतला. राहुल गांधी यांच्या रॅलीच्या सुरुवातीला टीका टिप्पणी झाली. ते महाराष्ट्रात रॅली घेऊन आले.
हा काही काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम आहे असं स्वरुप त्यांनी ठेवलं नाही. त्यांनी सर्व पक्षांना सोबत घेतलं. आमचे सहकारीही गेले. तिथे राष्ट्रवादीचेनेतेही गेले. अनेक सार्वजनिक संस्था होत्या. गांधीजींच्या विचाराने काम करणाऱ्या संस्था त्यात सहभागी झाल्या होत्या, असं त्यांनी सांगितलं.
राहुल गांधींच्या रॅलीला गावातून सामान्य माणूस आणि स्त्रियांची उपस्थिती आणि सहानूभूती मोठी होती. या रॅलीतून राहुल गांधी यांची इमेज दुषित करण्याचा प्रयत्न हाणून पाडला गेला आहे. राहुल गांधी हे कष्ट घ्यायला तयार झाले हे त्यातून स्पष्ट झालं आहे, असंही त्यांनी सांगितलं.