‘नगरमध्ये भाजप आमदारांच्या मतदारसंघातच लॉकडाऊन, निर्णयावर फेरविचार करा अन्यथा तीव्र आंदोलन,’ सुजय विखेंचा इशारा

| Updated on: Oct 04, 2021 | 11:59 PM

जिल्ह्यातील 61 गावांत लावण्यात आलेला कडक लॉकडाऊनला खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी विरोध केला आहे. हा निर्णय अन्यायकारक असून भाजपतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

नगरमध्ये भाजप आमदारांच्या मतदारसंघातच लॉकडाऊन, निर्णयावर फेरविचार करा अन्यथा तीव्र आंदोलन, सुजय विखेंचा इशारा
सुजय विखे-पाटील, लॉकडाऊन
Follow us on

अहमदनगर : जिल्ह्यातील 61 गावांत लावण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनला खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी विरोध केला आहे. हा निर्णय अन्यायकारक असून भाजपतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विखे यांनी गंभीर आरोप केले आहेत. अजित पवारांच्या सूचनेनुसार पुणे आणि नाशिकला वाचविण्यासाठी नगर जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे, असं विखे यांनी म्हटलंय.

भाजप आमदारांच्या मतदारसंघातच लॉकडाऊन

अहमदनगरच्या 61 गावांमध्ये पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या 61 गावांमध्ये अचानक 10 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त आढळल्याने जिल्हाधिकाऱ्यांना लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला आहे. मात्र या निर्णयाला विखे पाटील यांनी विरोध केला आहे. त्यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. “जिल्ह्यातील भाजप आमदारांच्या मतदारसंघातच सर्रासपणे लॉकडाऊन लावलं जात आहे. सत्ताधारी पक्षांच्या मतदारसंघात लॉकडाऊन लावला जात नाही. बाकी जिल्ह्यात आकडे लपवले जात असून सत्तेतील पक्षाकडून अन्याय होत असेल तर आम्ही सहन करणार नाही,” असे विखे पाटील म्हणले आहेत. तसेच आज जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना त्यांनी निवेदन दिलं आहे. येत्या दोन दिवसांत याचा फेरविचार झाला नाही, तर भाजपतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा विखे पाटील यांनी दिलाय.

एकूण 61 गावांमध्ये लॉकडाऊन, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

नगर जिल्ह्यात एकूण 61 गावांमध्ये 10 दिवसांसाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात 24 गावांमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील या 61 गावांमध्ये जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्या आदेशाने लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

निर्बंधांचे पालन झाले नाही, म्हणून संसर्ग पसरला 

जिल्ह्यात दररोज 500 ते 800 नवीन कोरोना प्रकरणे नोंदवली जात आहेत. कोरोना पॉझिटिव्ह दर 5 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ज्या गावांमध्ये 20 पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार केले जात आहेत, तेथे कंटेनमेंट झोन घोषित करणे, जमावबंदी, कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आणि अशा गावांमध्ये 100% लसीकरण करणे आवश्यक आहे. या संदर्भात, संबंधित गावांना कोरोना प्रभावित भागातील निर्बंध आणि नियमांचे पालन करण्याचे आदेशही देण्यात आले. पण त्या निर्बंधांचे पालन झाले नाही. यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरला.

इतर बातम्या :

सायबर हल्ला की खरंच सर्व्हर डाऊन? व्हॉट्सअॅप, फेसबुक डाऊनवर सायबर तज्ज्ञ म्हणतात….

whatsapp down | व्हॉट्सअ‌ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम तासाभरापासून डाऊन ! नेमके कारण काय ? मेसेज पाठवण्यास नेटकऱ्यांना अडचणी

Pune Heavy Rain : पुण्यात तुफान पाऊस, स्टेशन परिसरात पाणी साचलं; नागरिकांनी काळजी घेण्याचं महापौरांचं आवाहन