वाघानं घेतले 12 बळी, 12 गावांतील लोकं आले रस्त्यावर, काय आहे प्रकरण?

| Updated on: Sep 23, 2022 | 4:50 PM

रस्त्याच्या दोन्ही बाजूला आलेली झुडपे तोडण्यात यावी, प्रत्येक गावातील किमान पाच व्यक्तींना व्याघ्र संरक्षण दलात समाविष्ट करवात यावे अशा नागरिकांच्या मागण्यात आहेत.

वाघानं घेतले 12 बळी, 12 गावांतील लोकं आले रस्त्यावर, काय आहे प्रकरण?
वनविभागा विरोधात इतक्या गावातील लोकं आक्रमक
Image Credit source: t v 9
Follow us on

मोहम्मद इरफान, गडचिरोली : आरमोरी तालुक्यात वाघाची दहशत कायम आहे. वाघांनी गेल्या काही दिवसांत 12 जणांचे बळी घेतले. त्यामुळं परिसरातील नागरिक आक्रमक झालेत. शासनाने येत्या आठ दिवसांत नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करावे. अन्यथा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा बाराही गावातील नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे. आरमोरीत आज नागरिक रस्त्यावर उतरले होते. पण, पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था पुरविल्यानं आंदोलनाला गालबोट लागलं नाही.

नागरिकांच्या मागण्या काय?

नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा, शेतकऱ्यांना,शेतात जाण्यायेण्याकरिता वनविभागाने शेतकऱ्यांना सुरक्षा देण्यात यावी, रस्त्याच्या दोन्ही बाजूला आलेली झुडपे तोडण्यात यावी, प्रत्येक गावातील किमान पाच व्यक्तींना व्याघ्र संरक्षण दलात समाविष्ट करवात यावे अशा नागरिकांच्या मागण्यात आहेत.

याशिवाय घरगुती वीज बिलात ग्राहकावर लादलेला अतिरिक्त इंधन समायोजन आकार रद्द करण्यात यावा, उपविभागीय वीज अभियंता बोबडे यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, वनविभागाने जंगलालगत असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला एकरी पन्नास हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, जोगीसाखरा येथे 33 के.वी.चे. वीजपॉवर हाउस मंजूर करण्यात यावे आदी विविध मागण्यांसाठी आरमोरी तालुका वासीयाच्या नेतृत्वात आरमोरी येथील राष्ट्रीय मार्गावरील स्थानिक शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत चक्काजाम आंदोलन केलं.

या बारा गावांतील नागरिक रस्त्यावर

यासाठी आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा, पळसगाव, शंकरनगर, सालमारा कनेरी, पाथरगोटा, रामपूर, अंतरजी, कासवी, आष्टा व अन्य गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले. चक्काजाम आंदोलन करण्यापूर्वी शेकडो आंदोलनकर्त्यांनी सर्वप्रथम अधिकाऱ्यांना बोलावून समस्या निराकरण करण्यासाठी सभा घेतली. शेकडो आंदोलनकर्त्यांनी आपल्या गावातील समस्यांचा अधिकाऱ्यासमोर पाढा वाचला.

परंतु आंदोलन कर्त्याच्या प्रश्नांना योग्य उत्तर मिळाली नाहीत. आंदोलनकर्ते अधिकाऱ्यासमक्ष राष्ट्रीय मार्गावर चक्काजाम करण्याचा पावित्रा घेतला. आरमोरी पोलिसांनी परिस्थितीचे लक्षात घेता चक्काजाम करण्यापूर्वीच नेतृत्व करणाऱ्या आंदोलकांना अटक करून पोलीस ठाण्यात नेले.

नेतृत्व करणाऱ्या प्रमुख आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. त्यामुळं विविध गावातील नागरिकांनी पोलीस स्टेशनकडे आपला मोर्चा वळवला. आंदोलनकर्त्यांना सोडण्याची मागणी केली. यावेळी आरमोरी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या प्रमुख आंदोलकांना अटक करून सुटका केली.

आंदोलनस्थळी वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्राणिल गिलडा, तहसीलदार कल्याणकुमार डहाट, वनपरिक्षेत्राधिकारी अविनाश मेश्राम व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी या आंदोलनात आरमोरी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष संदीप ठाकूर, गडचिरोली जिल्हा रयत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दिलीप घोडाम व बारा गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.