दगाबाज पावसाचा अवकाळी घाव, नाशिकचा शेतकरी हवालदिल; द्राक्ष, कांदा, स्ट्रॉबेरीला बसणार फटका

ऐन हिवाळ्यात पावसाने दिलेल्या तडाख्यामुळे शेतकरी हादरून गेला आहे. जिल्ह्यात बुधवारी 176.6 मिमी पावसाची नोंद झाली. यापूर्वी पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीने खरीप पीक मातीमोल झाले. आता रब्बी हंगामावर अवकाळी संकट दाटून आले आहे.

दगाबाज पावसाचा अवकाळी घाव, नाशिकचा शेतकरी हवालदिल; द्राक्ष, कांदा, स्ट्रॉबेरीला बसणार फटका
नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसाने द्राक्षाचे पीक संकटात आले आहे.
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Dec 02, 2021 | 10:39 AM

नाशिकः ऐन हिवाळ्यात पावसाने दिलेल्या तडाख्यामुळे शेतकरी हादरून गेला आहे. जिल्ह्यात बुधवारी 176.6 मिमी पावसाची नोंद झाली. यापूर्वी पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीने खरीप पीक मातीमोल झाले. आता रब्बी हंगामावर अवकाळी संकट दाटून आले आहे. विशेषतः यामुळे द्राक्ष आणि कांदा पिकाचे नुकसान होणार असून, आंब्यालाही याचा तडाखा बसणार आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा घात केला आहे. संकटामागून संकटातून सावरायचे तरी कसे, असा प्रश्न त्यांना पडलाय.

द्राक्ष बागांवर संकट

अवकाळी पावसाचा निफाड तालुक्यातल्या द्राक्ष बागांना फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पंधरा दिवसांपूर्वीही ढगाळ वातावरण होते. त्यावेळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे द्राक्ष बागांची कूज आणि गळ झाली. आता पुन्हा पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांवर संकटच कोसळले आहे. त्यामुळे द्राक्षाच्या मण्यांना तडे जाऊ शकतात. सोबतच भुरी, डाऊनी, गळ, कूज या समस्या पुन्हा डोके वर काढण्याची भीती व्यक्त होत आहे. याचा द्राक्ष पिकावर गंभीर परिणाम होणार आहे.

कांदा काढणीला

नाशिक जिल्ह्यात लासलगाव तालुक्यात कांद्याचेही मोठे उत्पादन होते. लासलगाव ही जगप्रसिद्ध बाजारपेठ येथे आहे. सध्या शेतकऱ्यांचा कांदा काढणीला आला आहे. अनेक शेतात कांदा काढून त्याचे ढीग तयार केलेले आहेत. तर कुठे काम सुरू आहे. या अचानक सुरू झालेल्या पावसाने कांदा पिकालाही मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे हा पाऊस लवकरात लवकर थांबावा, अशीच विनंती मेटाकुटीला आलेला शेतकरी करत आहे. त्यांचा रब्बी हंगाम हातचा गेला, तर प्रचंड नुकसान होणार आहे.

भाताचेही नुकसान

जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी सध्या मका काढायला सुरुवात केली आहे. कोणी भात, नागरी, उडीद, खुरसानीची पिके कापून ठेवली आहेत. त्यामुळे रानात पडलेले पीक उचलायचे कसे, त्याची रास कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. शिवाय टोमॅटो, वांगे, भोपळा या भाजीपाल्याची शेती करणारा शेतकरीही जेरीस आला आहे. सतत सुरू असलेल्या पावसाने भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा भाजीपाल्याचे दर वाढू शकतात.

आंबा, स्ट्रॉबेरीला फटका

जिल्ह्यातल्या हरसूल परिसरात बुधवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आंबा उत्पादक धास्तावले आहेत. डिसेंबरमध्ये आंब्याला मोहोर येतो. आता या पावसाने मोहोर काळवंडळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुरगाणा तालुक्यातल्या बोरगाव घाटमाथा परिसरात पावसाने हजेरी लावली. या भागात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी आणि टोमॅटोचे पीक घेतले जाते. मात्र, या पिकांनाही हा पाऊस घातक ठरणार आहे.

इतर बातम्याः

आले निमंत्रकांच्या मना…चक्क साहित्य संमेलनाध्यक्षांचे कथाकथन रद्द; संवादावर बोळवण, इतरांचे पुसूच नका…!

साहित्य संमेलन वादात भुजबळांची शिष्टाई, भाजप नेत्यांची नाराजी दूर; फडणवीस लावणार हजेरी

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us