पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, सुप्रिया सुळेंची मोर्चात एन्ट्री; फडणवीस सरकारकडे केली मोठी मागणी
पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं आहे. या मोर्चामध्ये सुप्रिया सुळेंची एन्ट्री झाली. मोर्चात सहभागी झाल्यानंतर फडणवीस सरकारकडे मोठी मागणी केली.

एमपीएससी पेपर फुटीवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पुण्यात पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढलाय. विद्यार्थी आक्रोश मोर्चामध्ये मुलींची संख्या लक्षणीय आहे. एमपीएससी पेपरफुटी होऊ नये म्हणून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विद्यार्थी आक्रोश मोर्चात सामील झालेल्या मुलींची आहे. या मोर्चात सुप्रिया सुळे यांनी सहभाग दर्शवला. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी सरकारकडे मोठी मागणी केली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं आहे. विद्यार्थी चर्चेला तयार आहेत. परंतु कोण येत आहे, त्यांच्याशी चर्चा करायला. दुर्दैवी आहे की, मुलांनी शिक्षण, नोकरी केली पाहिजे, चांगलं शिक्षण घेणे, देशाची सेवा करणे केले पाहिजे. परंतु दुर्दैवाने विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे. हे सरकारचं अपयश आहे. मी विनम्रपणे सांगत आहे की, एका जबाबदार व्यक्तीला पाठवा आणि विद्यार्थ्यांशी चर्चा करा’.
पेपरुफुटीवर पुढे म्हणाल्या, ‘तंत्रज्ञानाचा उपयोग का होत नाही, माहीत नाही. अशा अनेक परीक्षा जगभर होतात. भारतातही अनेक परीक्षा आहेत. तिथे पेपर फुटले नाहीत. मग याच परीक्षेत कसे पेपर फुटतात? एवढं एआय, तंत्रज्ञान आहे, त्यामुळे काही तरी करू शकतात. पेपर फुटणे थांबू शकत नाही, यावर माझा विश्वास नाही’.
‘देशात स्वायत्त संस्था किती आहे, हे मी सांगायला नको. मी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्र्यांना विनंती करते की, कोणीतरी जबाबदार व्यक्ती पाठवा. मुलांसोबत चर्चा करा. सगळे मिळून मार्ग काढू. सर्व आपली मुले आहेत. त्यांच्यासाठी मार्ग काढू. सरकार कुणासाठी आहे. सरकार प्रत्येकबाबतीत अपयश आहे. तुमच्या चॅनलचे तास कमी पडतील, तितके आंदोलने राज्यात होत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या किती झाल्या, हे देखील तुमच्या चॅनलवर पाहिले. शेतकरी, महिला, युवक सर्व रस्त्यावर आहेत. सुळे पुढे म्हणाल्या, ‘ मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून लवकरात लवकर तोडगा काढावा. मोर्चात झालेली गर्दी पाहून विद्यार्थ्यांचा आक्रोश लक्षात येत आहे. अध्यक्ष आणि सचिव यांच्या राजीनाम्याची विद्यार्थी वेळोवेळी मागणी करतात, यावरती सरकारने विचार करावा’, अशी मागणी त्यांनी पुढे केली.
