‘शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार’, अमित शाह यांचा घणाघात, मराठा आरक्षणावरुनही पवारांवर निशाणा
"विरोधक भ्रष्टाचारची बात करत आहेत. देशाच्या राजकारणात शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरगना (सूत्रधार) आहेत. तुम्ही काय आरोप करत आहात? या देशात कोणत्याही सरकारमध्ये भ्रष्टाचार वाढवण्याचं काम कुणी केलंय तर ते शरद पवार यांनी केलं आहे. मी डंके की चोट पे सांगत आहे", असा घणाघात अमित शाह यांनी केला.

भारतीय जनता पक्षाचा पुण्यात आज कार्यक्रम आयोजित करण्यात आला. भाजपकडून पुण्यात आज आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची विशेष उपस्थिती राहिली. या कार्यक्रमात अमित शाह यांनी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी अमित शाह यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. शरद पवार हे भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरगना (सूत्रधार) आहेत, अशी खोचक टीका अमित शाह यांनी केली. अमित शाह यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
“विरोधकांनी म्हटलं, भाजप आरक्षण संपवत आहे. आम्ही उत्तर देताना काही ठिकाणी संकोच करत होतो. लोकांच्या मनात भ्रम निर्माण झाला. मी आज सांगायला आलो आहे की, 10 वर्षांचा एक्स्टेन्शन नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये मिळालं आणि पूर्ण बहुमत असतानाही आरक्षणाला बळ देण्याचं काम आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. विरोधकांनी संविधानाचा विषय काढला. आम्ही उत्तर दिलं. आता निवडणूक महाराष्ट्रात आली आहे. आता नव्यानव्या प्रकारचे गैरसमज शरद पवार उभे करत आहेत”, असा आरोप अमित शाह यांनी केला.
‘पवारांचं सरकार येईल तेव्हा मराठा आरक्षण गायब होईल’
“मी आज शरद पवारांना सांगायला आलोय, आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्व उत्तर देत आहेत. पण माझं लांबून एक निरीक्षण आहे, ते मी आता तुमच्यासमोर सांगत आहे, महाराष्ट्रात जेव्हा-जेव्हा भाजपचं सरकार येतं, मराठा समाजाला आरक्षण मिळतं आणि जेव्हा-जेव्हा शरद पवार यांच्या आघाडीचं सरकार येतं तेव्हा मराठा आरक्षण गायब होतं. मी विचार करुन हे वाक्य बोलतं. महाराष्ट्रात 2014 मध्ये भाजपचं सरकार आलं. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकलं. मध्यंतरी शरद पवार यांचं सरकार आलं, मराठा आरक्षण गायब झालं. आम्ही पुन्हा आलो. आम्ही आतासुद्धा मराठा आरक्षण देण्याचं काम केलं आहे. शरद पवार यांचं सरकार येईल, तेव्हा मराठा आरक्षण पुन्हा गायब होईल. मराठा आरक्षण कायम ठेवायचं असेल तर कुणाचं सरकार आणलं पाहिजे? समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम भाजपने केलं आहे”, अशी टीका अमित शाह यांनी केली.
“झूठ कसं पसरवता? जुना निर्णय असून त्याच्या नोटीफिकेशनची माहिती व्हायरल करतात. मी मंत्री पीयूष गोयल यांना विचारलं. ते म्हणाले, हा आपला निर्णय नाही तर शरद पवार यांच्या सरकारचा निर्णय आहे. ते म्हणत आहेत की, दुधाचं पावडर आयात होतंय. कन्फ्यूजनमध्ये येऊ नका. ते सर्क्यूलर काढून गेले होते, नरेंद्र मोदी सरकारने गेल्या 10 वर्षांत एक किलोदेखील दुधाचं पावडर आयात केलेलं नाही. पुढच्या पाच वर्षांपर्यंत 1 ग्रॅमसुद्धा दुधाचं पावडर आयात केलं जाणार नाही. हे खोटं पसरवून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत”, असं अमित शाह म्हणाले.
‘शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार’
“विरोधक भ्रष्टाचारची बात करत आहेत. देशाच्या राजकारणात शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरगना (सूत्रधार) आहेत. तुम्ही काय आरोप करत आहात? या देशात कोणत्याही सरकारमध्ये भ्रष्टाचार वाढवण्याचं काम कुणी केलंय तर ते शरद पवार यांनी केलं आहे. मी डंके की चोट पे सांगत आहे. आमच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप करताय?”, असा घणाघात अमित शाह यांनी केला.
“पण यावेळी शरद पवारजी माझा कार्यकर्ता हुशार झाला आहे. त्याला तुमच्या खोट्या प्रचाराची जाणीव झाली आहे. आता तुमचा खोटा प्रचार चालणार नाही. घरोघरी जावून या खोट्या प्रचाराचा पर्दाफाश करायचा आहे. हे खोटं बोलणार आणि भ्रम निर्माण करतील. प्रत्येक कार्यकर्ता हा कमळसाठी समर्पित व्हावा. प्रत्येक कार्यकर्त्याने कमळला जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करावी”, अशा सूचना अमित शाह यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिल्या.
