…तर महानगरपालिका निवडणुकांतही ओबीसींना आरक्षण मिळणार नाही, चंद्रकांत पाटलांना भीती

| Updated on: Dec 08, 2021 | 7:17 PM

आघाडी सरकारने कोर्टाच्या आदेशानुसार वेळेत ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे काम पूर्ण केले नाही तर दोन तीन महिन्यात राज्यात मोठ्या संख्येने होणाऱ्या महानगरपालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत ओबीसी समाजाला आरक्षणाला मुकावे लागेल.

...तर महानगरपालिका निवडणुकांतही ओबीसींना आरक्षण मिळणार नाही, चंद्रकांत पाटलांना भीती
चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
Follow us on

पुणे: आघाडी सरकारने कोर्टाच्या आदेशानुसार वेळेत ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे काम पूर्ण केले नाही तर दोन तीन महिन्यात राज्यात मोठ्या संख्येने होणाऱ्या महानगरपालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत ओबीसी समाजाला आरक्षणाला मुकावे लागेल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज दिला. महाविकास आघाडी सरकारला ओबीसींनी राजकीय आरक्षण गमावलेलेच हवे आहे, असा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, राज्यात सध्या चालू असलेल्या भंडारा – गोंदिया जिल्हा परिषदा व 106 नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये केवळ ओबीसींच्या जागांवरील निवडणूक थांबवून बाकी जागांवर निवडणूक घेण्याने राज्यात मोठा गोंधळ उडेल. त्यामुळे या निवडणुका सरसकट स्थगित कराव्यात, अशी मागणी करणारे निवेदन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांना बुधवारी पाठविले आहे.

सरकारला हेच हवं

ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला एंपिरिकल डेटा गोळा करणे अपेक्षित आहे. राज्य सरकारने त्यासाठी राज्य मागास आयोगाला जबाबदारी दिली आहे पण त्यासाठीची संसाधने सरकार आयोगाला देत नाही. त्यामुळे एंपिरिकल डेटा गोळा करण्याचे काम होत नाही. याला कंटाळून आयोगाच्या काही सदस्यांनी राजीनामा दिला आहे. राज्य सरकारने एंपिरिकल डेटाचे काम लवकर पूर्ण केले नाही तर आगामी महानगरपालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच जाहीर होतील. त्यानंतर पाच वर्षे या समाजाला प्रतिनिधित्व मिळणार नाही. महाविकास आघाडी सरकारला हेच घडलेले हवे आहे, असंही त्यांनी सांगितलं.

नाचता येईना अंगण वाकडे

2011साली जनगणनेच्या वेळी गोळा केलेली माहिती तसेच सामाजिक – आर्थिक पाहणीची माहिती आणि सर्वोच्च न्यायालयाने गोळा करायला सांगितलेला एंपिरिकल डेटा यांचा काहीही संबंध नाही. एंपिरिकल डेटासाठी प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रातील ओबीसींची संख्या गोळा करणे अपेक्षित आहे. महाविकास आघाडी सरकार सहज होण्यासारखे इम्पिरिकल डेटाचे काम करत नाही आणि केंद्र सरकारबद्दल तक्रार करते म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असा प्रकार आहे, असं ते म्हणाले.

मोदीच यशस्वी होतील

ओबीसींचे आरक्षण लागू करण्यासाठी अध्यादेश जारी करण्याचा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचा आरोप म्हणजे खोटे बोलण्याची कमाल आहे, असे त्यांनी ठणकावले. भाजपाच्या विरोधात एकच आघाडी तयार करण्याच्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याविषयी एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असता पाटील म्हणाले की, विरोधी पक्षांनी कितीही प्रयत्न केले तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणसासाठी केलेल्या कामांमुळे आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मतदार मोदीजींनाच यशस्वी करतील आणि भारतीय जनता पार्टीला अधिक जागा मिळतील.

संबंधित बातम्या:

CDS Bipin Rawat Death News: … आणि देशाचा श्वास थांबला; हेलिकॉप्टर दुर्घटनेत माजी लष्करप्रमुख, सीडीएस बिपीन रावत यांचा मृत्यू

Bipin Rawat Helicopter crash : कोण होते सीडीएस जनरल बिपिन रावत? जाणून घ्या रावत यांचा लष्करातील संपूर्ण प्रवास

Army helicopter crash : पंतप्रधान मोदींनी बोलवली तातडीची बैठक, सरक्षणमंत्री, गृहमंत्रीही राहणार उपस्थित