पुणे : कोरोनाच्या महामारीमुळे नागरिक आणि शासनव्यवस्थेने आरोग्य या विषयाला पहिल्यांदाच गंभीरपणे घ्यायला सुरुवात केली. पुरेशी आरोग्यव्यवस्था उभारणीला प्राधान्य दिलं ही चांगली बाब आहे. मात्र, कोरोनाचे संकट संपताच आरोग्य हा विषय नेहमीप्रमाणे पुन्हा अडगळीत जावू नये, यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करावे लागतील, असं मत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी केले. ते एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या प्रांगणातील स्वातंत्रदिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. या ठिकाणी कोविड योद्धे आया, सफाईगार आणि रुग्णालय कक्षसेवकांच्या हस्ते ध्वज फडकावण्यात आला.
डॉ. प्रदीप आवटे यांनी आरोग्य विभागाला पुरेशा मनुष्यबळाची व आवश्यक साधनांची आजही गरज आहे हेही सांगितलं. तसेच केंद्र सरकार ते स्थानिक स्वराज्य सरकारे अशा सर्व पातळ्यांवर अर्थसंकल्पात आरोग्यासाठी पुरेशी तरतूद व्हायला हवी हा मुद्दा आग्रहाने मांडला. आम्हाला स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकवण्याचा सन्मान मिळाला याचा आनंद वाटला आणि त्यामुळे जवळपास दीड वर्षे कोरोना काळात सतत तणावाखाली केलेल्या मेहनतीचे आज चीज झाले, अशी भावना आया त्रिवेणी सोनवणे, सफाईगार अनिता रोकडे आणि कक्ष सेवक अशोक शिंदे यांनी व्यक्त केली.
एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे विश्वस्त सचिव सुभाष वारे यांनी कार्यक्रमाचा समारोप करताना कोरोना काळात शासकीय रुग्णालयात सेवा दिलेल्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत कायमस्वरुपी नेमणूक मिळावी, अशी मागणी केली. तसेच नागरिकांनी खासगी रुग्णालयांऐवजी सरकारी रुग्णालयातच उपचार घेण्याची सवय लावली, तर सार्वजनिक आरोग्यव्यवस्था सुधारायला मदतच होईल,” असं मत व्यक्त केलं.
कार्यक्रमाला पूरोगामी मित्र संघटनांचे अनेक कार्यकर्ते तसेच पुणेकर नागरिक आणि फाउंडेशनचे कार्यकर्त्यांसोबत विश्वस्त मधु पाटील, चंद्रकांत निवंगुणे, संतोष म्हस्के हे उपस्थित होते.
Dr Pradeep Awate comment on Health system budget fund and Corona