50 कोटींना 2500 कोटींचं उत्तर, शिंदे गटाची अनोखी शक्कल, मविआ नेते अडणीत येणार?

| Updated on: Nov 08, 2022 | 6:06 PM

शिंदे गटाच्या प्रत्येक आमदाराने भाजपसोबत जाण्यासाठी 50 खोके (कोटी रुपये) घेतल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. याच आरोपांवरुन विरोधकांना घेरण्यासाठी आता शिंदे गटाकडूनही रणनीती आखण्यात आलीय.

50 कोटींना 2500 कोटींचं उत्तर, शिंदे गटाची अनोखी शक्कल, मविआ नेते अडणीत येणार?
Follow us on

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या खोक्यांवरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडत आहेत. ’50 खोके, एकदम ओक्के’, अशी टीका विरोधकांकडून सत्ताधारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर केली जातेय. एकनाथ शिंदे यांनी साडेतीन महिन्यांपूर्वी शिवसेनेच्या 40 आणि 10 अपक्ष असे एकूण 50 आमदारांसह मोठी बंडखोरी केली होती आणि भाजपचा हात धरला होता. पण भाजपसोबत जाण्यासाठी प्रत्येक आमदाराने 50 खोके (कोटी रुपये) घेतल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. याच आरोपांवरुन विरोधकांना घेरण्यासाठी आता शिंदे गटाकडूनही रणनीती आखण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या गोटात प्रचंड वेगाने हालचाली घडत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना घेरण्यासाठी शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांना मैदानात उतरवलंय. शिंदे गटाकडून शिवतारे यांना प्रवक्तेपदी नियुक्त करण्यात आलंय.

विशेष म्हणजे शिंदे गटाच्या प्रवक्तेपदी नियुक्त झाल्यानंतर लगेच विजय शिवतारे कामाला लागले आहेत. शिंदे गटाच्या नेत्यांना 50 खोक्यांचा आरोप करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी विजय शिवतारे न्यायालयीन मार्ग अवलंबणार आहेत.

हे सुद्धा वाचा

विजय शिवतारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिलीय. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना 50 खोक्यांच्या आरोपांप्रकरणी आरोप सिद्ध करण्याचे किंवा माफी मागण्याचं आवाहन केलंय.

सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे यांनी माफी मागितली नाही, तर त्यांच्याविरोधात उद्या 2500 कोटींचा मानहानीचा दावा ठोकू, असं विजय शिवतारे म्हणाले आहेत. तसेच याबाबत उद्या त्यांना नोटीस पाठवली जाईल, असंही शिवतारेंनी सांगितलं.

विजय शिवतारे नेमकं काय म्हणाले?

“अब्दुल सत्तारांनी शिवराळ भाषा ही खरंतर रिअॅक्शन होती. तुम्ही किती चिडवणार, किती त्रास देणार त्यावर ती प्रतिक्रिया होती. तुमचे आरोप खरे असतील तर ते सिद्ध करा. नाहीतर मानहानीच्या केसला सामोरं जा. किंवा माफी मागा”, असं विजय शिवतारे म्हणाले.

“50 आमदार गुणीले 50 असे एकूण 2500 कोटींचे अब्रु नुकसानीचे दावे केले जातील. त्यांना उद्या नोटीस दिली जाईल”, अशी प्रतिक्रिया विजय शिवतारे यांनी दिली.

पाहा लाईव्ह टीव्ही :