खडकवासला धरण 100 टक्के भरलं, पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली, पुणेकर निर्धास्त!

| Updated on: Sep 14, 2021 | 9:23 AM

गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे काठोकाठ भरली आहे. त्यामुळे पुणेकर आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खडकसावला धरण 100 टक्के भरल्याने धरणातून विसर्ग सुरु केलाय.

खडकवासला धरण 100 टक्के भरलं, पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली, पुणेकर निर्धास्त!
खडकवासला धरण
Follow us on

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे काठोकाठ भरली आहे. त्यामुळे पुणेकर आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खडकसावला धरण 100 टक्के भरल्याने धरणातून विसर्ग सुरु केलाय. त्यामुळे मुठा नदीचं पात्र दुधडी भरुन वाहू लागलंय.

पुणे जिल्ह्यातील धरणं काठोकाठ भरल्याने आता पुणेकरांची पिण्याच्या पाण्याची वर्षभराची चिंताही मिटली आहे. त्यामुळे आगामी काळात पुणेकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याचा धोका टळला आहे. पाऊस आणखी काही दिवस सुरु राहणार असल्याने शेती आणि इतर कामांसाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध होईल.

खडकवासला भरलं, मुठेचं पात्र दुथडी भरुन वाहू लागलंय

खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु केल्याने मुठा नदीचं पात्र दुधडी भरुन वाहू लागलंय. शहराच्या मध्यवर्ती भागातील भिडे पुलाला पाणी लागलंय. नदीपात्रावरील रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुकीसाठी रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्याने नदीपात्रात सुरु असलेल्या मेट्रोच्या कामाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

मुळशी धरणातूनही पाणयाचा विसर्ग

मुळशी धरणात सध्या 94% पाणीसाठा असून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वीजगृहातून सरासरी 2000-2300 क्युसेक्स ने पश्चिमेकडे विसर्ग चालू केला आहे. पाणलोट क्षेत्रातील पर्ज्यन्याचा कल पाहता सांडव्यातून मुळा नदीमध्ये विसर्ग आवश्यकतेप्रमाणे आज अथवा उद्या सोडण्यात येईल.

पुण्याला पुढील पाच दिवस ऑरेंज ॲलर्ट

भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील काही तासात बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्यानं मुसळधार पाऊस होऊ शकतो. तर, पुढील 3 ते 4 दिवसात महाराष्ट्रात पावसाच्या प्रमाणात वाढ अपेक्षित असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्यावतीनं जारी करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुण्यात सध्या रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे.

14 सप्टेंबरला पावसाची स्थिती कशी?

हवामान विभागानं मंगळवारी पालघर, ठाणे, रायगड,पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, परभणी, हिंगोली नंदूरबार, जळगाव, धुळे, औरंगाबाद, जालना, भंडारा गोंदिया यलो अ‌ॅलर्ट दिला आहे.

15 सप्टेंबरला पावसाची स्थिती कशी?

हवामान विभागानं पालघर पुणे जिल्ह्याला ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, ठाणे, सातारा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि चंद्रूपर जिल्ह्यांना यलो अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

इतर बातम्या:

Weather Forecast : पावसाचा जोर वाढणार, पुढच्या 4 दिवसात कोकण,पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभर मुसळधार पावसाचा इशारा

पावसानंतर आता करप्या रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी हतबल