“शिंदे यांचे बंड नव्हे ही तर गद्दारी;” अजित पवार यांचा नाना काटे यांच्या प्रचारसभेतून निशाणा

जून महिन्यात शिंदे यांच्या नेतृत्वात काही जणांनी गद्दारी केली. शिंदे यांचं ते बंड नव्हतंच ती गद्दारी होती, असं अजित पवार म्हणाले.

शिंदे यांचे बंड नव्हे ही तर गद्दारी; अजित पवार यांचा नाना काटे यांच्या प्रचारसभेतून निशाणा
अजित पवार
Image Credit source: tv9 marathi
Govinda Hatwar | Updated on: Feb 13, 2023 | 1:09 PM

पुणे : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, शिवसेनेचे युवा नेतृत्व आदित्य ठाकरे हेदेखील आता प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. राजेंद्र गवई, सचिन खरात हेही चिंचवड येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात उपस्थित होते. नाना काटे यांच्या प्रचारासाठी हे तिन्ही नेते चिंचवडमध्ये जाहीर सभा घेत आहेत. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, शिवसेनेला येथे एकत्र बोलावण्यात आलं. कारण २६ तारखेची होणारी निवडणूक आहे. मेळावा घेण्याचं ठरलं आहे. शिवसेना आणि महिला येथे उपस्थित आहेत. वेगळ्या अंगानी ही निवडणूक बघीतली पाहिजे.

तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडी स्थापन केली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात कारभार सुरू केला. विचारधारा वेगळी होती. पण, राज्याचे हित समोर ठेवून काम केलं. राज्याचा विकास करण्यासाठी काम सुरू होतं. दुर्दैवाने तीन महिन्यात कोरोना आला. त्यानंतर महाराष्ट्राच्या कोरोनाकाळातील परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली गेली, याची आठवण अजित पवार यांनी करून दिली.

शिंदे यांचे बंड नव्हे गद्दारी

वरळीत आदित्य ठाकरे यांनी लक्ष घेतलं. व्हिडीओ कान्फरन्सच्या माध्यमातून बैठका होत होत्या. कोरोना काळात बेड वाढविण्यात आले. ऑक्सिजन प्लँट राबवत होतो. कुठंही आर्थिक बाबतीत अडचण येऊ दिली नाही. पण, जून महिन्यात शिंदे यांच्या नेतृत्वात काही जणांनी गद्दारी केली. शिंदे यांचं ते बंड नव्हतंच ती गद्दारी होती, असं अजित पवार म्हणाले.

बंड करणारे निवडणुकीत पराभूत

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना काढली. मुंबईतील मराठी माणसासाठी शिवसेना काढली. शिवसैनिकांच्या जोरावर राज्यभर पोहचविली. दोन वेळा बंड झालं. १९९१-९२ ला बंड झालं. २००० नंतर बंड झालं. दोन्ही वेळा बंड करणारे पुढच्या निवडणुकीत निवडून आले नाहीत. हे तिसरं बंड झालं आहे. त्यामुळं यांची जागा निवडणुकीनंतर दिसेल, असंही अजित पवार यांनी सांगितलं.

बाळासाहेबांनी कार्यकर्त्यांना आमदार, खासदार केले

जे गेले त्यांचा शिवसेना काढण्यात काही वाटा आहे का, असा सवाल अजित पवार यांनी विचारला. साधी माणसं राज्यात खासदार-आमदार झालीत ती बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळं झालीत. वय झाल्यानं उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुखांची जबाबदारी सांभाळतील, असं सांगितलं होतं.

बंड करणाऱ्यांची अवस्था काय होणार?

युवा नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरे समोर आले. युवा नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरे काम करतील, हे बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं, असंही अजित पवार यांनी म्हंटलं. उद्या निवडणुका लागल्यावर बंड करणाऱ्यांची अवस्था काय होणार आहे, असा प्रश्नही अजित पवार यांनी उपस्थित केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us