विधानसभा, लोकसभेत आघाडी किती जागांवर जिंकणार?; कसब्याचा निकाल येताच संजय राऊत यांनी आकडाच सांगितला

सत्तेचं दर्शन प्रदर्शन, विकृती हे सर्व होऊनही कसब्यातील किंवा पुण्यातील मतदारांनी सत्ताधाऱ्यांना चपराक दिलीय. त्यापासून त्यांनी धडा घेतला पाहिजे. पुणेकरांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला. पण पुणेकर त्या अमिषाला बळी पडले नाहीत.

विधानसभा, लोकसभेत आघाडी किती जागांवर जिंकणार?; कसब्याचा निकाल येताच संजय राऊत यांनी आकडाच सांगितला
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 04, 2023 | 11:28 AM

पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळाल्यानंतर महाविकास आघाडीचा उत्साह वाढला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या सर्व निवडणुका एकजुटीने लढण्याचं आवाहन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलं आहे. एवढेच नव्हे तर राज्यातील जनतेचा मूड पाहता विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 200 आणि लोकसभेत 40 पेक्षा अधिक जागा मिळतील असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. कसबा तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, असं म्हणत राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटालाही डिवचलं आहे.

कसबा काय किंवा चिंचवड काय… दोन्ही निवडणुकांनी धडे दिले आहेत. महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहिलो तर कसब्याचा निकाल लागतो आणि थोडं जरी इकडे तिकडे झालं एखादा बंडखोर.. एखादा घटक पक्ष बाजूला गेला तर चिंचवडप्रमाणे निकाल लागतो. हा दोन्ही मतदारसंघातील मतदारांनी दिलेला हा धडा आहे. कसब्याचा हा निकाल हा राज्याच्या राजकीय भविष्यासाठी मार्गदर्शक आहे. 2024पर्यंत महाविकास आघाडीने मजबूतीनं एकत्र काम केलं, एकजूट दाखवली तर विधानसभेत महाविकास आघाडीच्या 200 पेक्ष अधिक जागा निवडून येतील. लोकसभेला 40 पेक्षा अधिक जागा जिंकू. हे मी खात्रीने सांगतो, असं संजय राऊत म्हणाले.

पुणेकर अभिनंदनास पात्र

सत्तेचं दर्शन प्रदर्शन, विकृती हे सर्व होऊनही कसब्यातील किंवा पुण्यातील मतदारांनी सत्ताधाऱ्यांना चपराक दिलीय. त्यापासून त्यांनी धडा घेतला पाहिजे. पुणेकरांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला. पण पुणेकर त्या अमिषाला बळी पडले नाहीत. त्याबद्दल पुणेकर अभिनंदनास पात्र आहेत. कसब्यात घराघरात पैशाचे पाकिटे फेकली आहेत. धंगेकर यांचं हे काम नाही. तो साधा कार्यकर्ता आहे.

तरीही लोकांनी धनशक्ती लाथाडली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यांचं कॅबिनेट एका कसब्यात रोज मंत्रिमंडळाच्या बैठका घेत होतं. जनतेने तेही नाकारलं. ही सुरुवात आहे. कसबा तो झांकी है महाराष्ट्र अभी बाकी आहे, ही घोषणा सध्या सुरू आहे. त्याची ही सुरुवात आहे, असं राऊत म्हणाले.

नानांच्या मताशी सहमत

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचं सुतोवाच केलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. स्थानिक स्वराज्य संस्थेचा विषय हा स्थानिक पातळीवर घेतला जातो. नाना पटोले यांच्या मताशी मी सहमत आहोत. पण तरीही आम्ही एकत्र बसून चर्चा करू. ग्रामपंचायत, जिल्हापरिषदा, नगरपरिषद आणि इतर निवडणुकांबाबत स्थानिक नेतेच अधिक निर्णय घेत असतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.