नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिपदासाठी शुभेच्छा दिल्या का? राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Jul 11, 2021 | 1:14 PM

मनसेच्या कार्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजप नेते नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळालं त्यावर त्यांना शुभेच्छा दिल्या का, असं त्यांना विचारण्यात आलं.

नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिपदासाठी शुभेच्छा दिल्या का? राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
नारायण राणे राज ठाकरे
Follow us on

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात आले होते. त्यांच्या हस्ते पुण्यातील शहर कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. मनसेच्या कार्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजप नेते नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळालं त्यावर त्यांना शुभेच्छा दिल्या का, असं त्यांना विचारण्यात आलं. नारायण राणे यांना मी फोन केला होता. त्यांचे दोन्ही फोन आणि त्यांच्या मुलांचे फोन बंद होते, असं राज ठाकरे म्हणाले. उद्या परवा नारायण राणे यांच्यासोबत बोलणं होईल, असं राज ठाकरे म्हणाले. (MNS leader Raj Thackeray said he call Narayan Rane for congratulation but his phone is off)

महापालिका निवडणुकीची तयारी?

यावेळी राज यांनी महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केल्याचं स्पष्ट केलं. म्हटलं तर महापालिका निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. कार्यालयाची गरज होती म्हणून नवं कार्यालय सुरू करण्यात आलं आहे. अजून निवडणुकांना वेळ आहे. सर्वच निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. शेड्युलप्रमाणे फेब्रुवारीत निवडणुका व्हायला पाहिजे, पण पुढे काय होईल माहीत नाही, असं सांगतानाच निवडणुकीची रणनीती काय असेल हे तुम्हाला का सांगू?, असा सवाल त्यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना केला.

मराठी आरक्षणावर राज ठाकरे काय म्हणाले?

मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण जर सर्वांनाच मान्य आहे तर अडलं कुठं?, असा सवाल करतानाच आरक्षणाच्या मुद्द्यावरून तरुणांची माथे भडकावून केवळ राजकारण करायचे आहे का?, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व पक्षीय नेत्यांना केला. खूप पूर्वी मराठा मोर्चा निघाला होता. त्यावेळी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी सर्वांना आरक्षण मान्य होतं. जर सर्वांनाच आरक्षण मान्य होतं तर अडलं कुठे? की केवळ इश्यू करायचा आहे? मराठा तरुणांची निव्वळ डोकी भडकवायची आहे का?, असा सवाल राज यांनी केला. जे मराठा आरक्षणाच्या बाबतीत आहे. तेच ओबीसी आरक्षणाबाबत आहे. ओबीसींचं आरक्षणही सर्वांना मान्य आहे तर अडलं कुठे? तुम्ही कोर्टात आरक्षणाची बाजू व्यवस्थित का मांडत नाहीत? एकमेकांकडे बोट का दाखवत आहात? एकदा या सर्वांना एका व्यासपीठावर आणा आणि विचारा, असं ते म्हणाले. निवडणुकीत हे नेते मतदान मागायला येतात. तेव्हा समाजाने या नेत्यांना जाब विचारावा. तुम्हाला आमचं आरक्षण मान्य आहे तर अडलं कुठं? असं त्यांना समाजाने विचारलं पाहिजे. आमचा वापर तर केला जात नाही ना? याचाही समाजाने विचार करायला हवा, असंही ते म्हणाले.

खडसेंच्या सीडीची वाट पाहतोय

ईडीचा गैरवापर होत आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर मी खडसेंच्या सीडीची वाट बघतोय, असं राज म्हणाले. यंत्रणांचा गैरवापर होत आहे. काँग्रेसचं सरकार असतानाही गैरवापर होत होता. भाजपचं सरकार असतानाही होत आहे. यंत्रणा काय तुमच्या हातातील बाहुली आहे का? या यंत्रणांचा चुकीचा वापर करून चालणार नाही. ज्यांनी गुन्हे केले ते मोकाट आहेत. आणि इतरांवर कारवाई होत आहे. हे चुकीचं आहे, असंही ते म्हणाले.

पवारच करेक्ट सांगतील

नवं सहकार खातं निर्माण करण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सहकार चळवळींना धोका निर्माण झाला आहे का?, असा सवाल राज यांना विचारण्यात आला. त्यावर तुम्ही पवार साहेबांनाच विचारा. तेच करेक्ट सांगतील, असं म्हणून त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं.

संबंधित बातम्या:

VIDEO: सरकारचा कारभारच बघायला मिळाला नाही; राज ठाकरेंचा मार्मिक टोला

मनसे पुणे मनपा स्वबळावर लढवणार का? राज ठाकरेंचं थेट उत्तर

(MNS leader Raj Thackeray said he call Narayan Rane for congratulation but his phone is off)