Maratha Morcha: मुश्रीफ म्हणतात, ती चूक होती, सतेज पाटील म्हणतात, मुंबईत या; मूक मोर्चात आमदार, मंत्री काय म्हणाले?; वाचा सविस्तर

| Updated on: Jun 16, 2021 | 1:31 PM

खासदार संभाजी छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या नेतृत्वात आज कोल्हापुरात मूक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चाला सर्वपक्षीय अनेक खासदार, आमदार आणि मंत्री उपस्थित होते. या सर्वांनीच आरक्षणाबाबतची आपली भूमिका मांडली आहे.

Maratha Morcha: मुश्रीफ म्हणतात, ती चूक होती, सतेज पाटील म्हणतात, मुंबईत या; मूक मोर्चात आमदार, मंत्री काय म्हणाले?; वाचा सविस्तर
Sambhaji Raje Chhatrapati
Follow us on

कोल्हापूर: खासदार संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वात आज कोल्हापुरात मूक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चाला सर्वपक्षीय अनेक खासदार, आमदार आणि मंत्री उपस्थित होते. या सर्वांनीच आरक्षणाबाबतची आपली भूमिका मांडली आहे. या मूक मोर्चाला संबोधित करताना कोण काय म्हणाले? याचा घेतलेला हा आढावा. (MP, MLA, Minister reaction on maratha reservation at kolhapur maratha morcha)

ती चूक होती

छत्रपती शाहू महाराजांची ही पुण्यभूमी आहे. जगाला समतेचा संदेश शाहू महाराजांनी दिला. रयतेसाठी खजिना रिता करणारे शाहू महाराज होते. मराठा समाज फक्त राजकीय आरक्षण मागत नाही. आम्ही जी चूक केली. तीच चूक युती सरकारनेही केली. आयोग न नेमता समिती नेमून आरक्षण दिलं, असं सांगतानाच राणे समिती नेमली ही आमची सर्वात मोठी चूक होती, असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कबूल केलं. भाजपला हात जोडून विनंती, राजकारण करू नका, मराठा आरक्षण टिकलं नाही म्हणता, पण कायदा नीट केला असता तर टिकला असता, त्यामुळे आता एकमेकांच्या चुकांकडे लक्ष न वेधता, मराठा समाजाच्या मागण्या कशा पूर्ण करता येतील यावर लक्ष केंद्रीत करू, असं आवाहनही त्यांनी केलं.

उद्याच मुंबईला या, सतेज पाटलांचं निमंत्रण

राज्य शासनाची भूमिका स्पष्ट करणे आमचं कर्तव्य आहे. सुप्रीम कोर्टातील वकिलांची टीम आपण बदलली नाही. केंद्र आणि राज्याच्या समनव्याची जबाबदारी संभाजीराजे तुमची आहे, राजेंनी मांडलेल्या मागण्यांवर राज्य शासन सकारात्मक आहे. मुख्यमंत्री आणि प्रमुख मंडळींना आपल्यासोबत बसून चर्चा करायची आहे, उद्याच तुम्ही मुंबईलाला यावं, उद्या मुख्यमंत्री, अजितदादा भेटतील. राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आमंत्रण देतो, हातात हात घालून चालायला हवं. संयमाच्या भूमिकेचं कौतुक आहे, संयमाला चर्चेची साथ देऊ. राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही ही ग्वाही देतो, असं पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलं.

संसदेचं अधिवेशन झालंच पाहिजे: माने

महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी कोल्हापूरने एक पाऊल पुढे घेतलं आहे. सर्व प्रतिनिधींना एकत्र केलं आहे. संभाजीराजेंनी सर्वांना हाक दिली, प्रकाश आंबेडकर सुद्धा कोल्हापूमध्ये आले. संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकरांनी रणशिंग फुंकलं आहे. ते नक्कीच यशस्वी होईल. आरक्षण कोणामुळे थांबलं?, आरक्षणाला कोणीच विरोध करत नसताना हा पेच सुटत का नाही? हा समाजाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील सर्व 48 खासदारांनी आणि सर्व आमदारांनी एकत्र यावं आणि केंद्राला विशेष अधिवेशन घेण्यासाठी भाग पाडावं. मराठा आरक्षणासाठी मी लोकसभेत आवाज उठवेन, पंतप्रधान, राष्ट्रपतींनाही भेटेन, असं शिवसेना खासदार धैर्यशील माने म्हणाले. न्यायालयीन लढाईत बाजू व्यवस्थित मांडण्यासाठी समिती गठीत झाली आहे. महाराष्ट्राने नवीन मागास आयोगही नेमला. हा राज्याचा की केंद्राचा हा प्रश्न समाजाला आहे. एका बाजूला जन रेटा तयार होतोय, 48 खासदारांनी अधिवेशनाची मागणी करावी, लोकसभेच आधिवेशन मराठा समाजासाठी झालं पाहिजे, असं ते म्हणाले.

न्याय निश्चितपणे मिळेल: ऋतुराज पाटील

आम्ही कोणत्या पक्षाचे आहोत, तुम्ही कोणत्य पक्षाचे आहात हे बाजुला ठेवून एकत्र आलं पाहिजे. आमदारा पलिकडे जाऊन ऋतुराज पाटील येथे उपस्थित राहिला आहे. मी या बैठकीला या आंदोलनाला पाठिंबा देतो. एकजुटीने राहिल्यास समाजाला न्याय निश्चितपण मिळेल, असं आमदार ऋतुराज पाटील म्हणाले. तर, हा प्रश्न सोडवा नाही तर जनता तुम्हाला सुट्टी देणार नाही, असा इशारा प्रकाश आवाडे यांनी दिला.

तामिळनाडूच्या धर्तीवर आरक्षण द्या- मंडलिक

तामिळनाडूच्या धर्तीवर केंद्राने निर्णय घ्यावा आणि आरक्षण द्यावं. संभाजीराजेंच्या मागण्या राज्य सरकारला मिळाल्या आहेत. तसेच राज्य सरकारनेही या मागण्यांवर सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मागण्या स्वीकारायचं ठरवलं आहे, असं खासदार संजय मंडलिक म्हणाले.

केंद्राला निश्चित जाग येईल- यड्रावकर

येत्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये सारथीसाठी निधीची तरतूद करण्याची मागणी करण्यात येईल. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जे करता येईल ते राज्य सरकार करत आहे. केंद्रानेही त्यावर भूमिका घेणं महत्त्वाचं आहे. आजच्या आंदोलनानंतर केंद्राला निश्चितच जाग येईल, असं आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितलं. (MP, MLA, Minister reaction on maratha reservation at kolhapur maratha morcha)

 

संबंधित बातम्या:

सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, हसन मुश्रीफांची गर्जना, आघाडी सरकारची ‘ती’ चूकही मान्य!

Maratha Morcha Kolhapur Live : संभाजीराजे, उद्याच मुंबईला या, सतेज पाटलांचं निमंत्रण

संभाजी छत्रपतींच्या मोर्चात आंबेडकर म्हणजे महाराष्ट्रात नव्या राजकीय आघाडीची मुहूर्तमेढ? वाचा 7 मोठे मुद्दे

(MP, MLA, Minister reaction on maratha reservation at kolhapur maratha morcha)