ते घरातून चांगले गेले आणि माशासारखे तडफडून…; पुण्यात विषारी दारु दुर्घटनेचा थरार, महिला म्हणाल्या पोलीस हफ्ता घेतात अन्…
पुण्यात विषारी दारूमुळे १३ जणांचा मृत्यू झाला असून फुगेवाडीतील महिलांनी पोलिसांवर हप्ता घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. 'माणसं माशासारखी तडफडून मेली' असा आक्रोश करत महिलांनी दारू बंदीची मागणी केली आहे.

पुण्यातील फुगेवाडी आणि परिसरात विषारी दारूमुळे १४ जणांचा बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. कालपर्यंत हसते-खेळते असणारे आपले कुटुंबीय अचानक डोळ्यांसमोरून गेल्यानं आनंदवन, काटे वस्ती, संजयनगर आणि आझाद चौक परिसरात नातेवाईकांचा आक्रोश सुरू आहे. या दुर्घटनेनंतर संतप्त झालेल्या प्रत्यक्षदर्शी महिलांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. “पोलिसांना हप्ता मिळतो, ते कारवाई काय करणार?” असा गंभीर आरोप या गावातील महिलांनी केला आहे.
“एकाच दिवशी घरातील चार जण गेले…”
या भीषण दुर्घटनेत आपल्या हक्काची माणसं गमावलेल्या एका महिलेने रडत रडत आपली व्यथा मांडली. त्या म्हणाल्या, “यात आमच्या घरातल्या चौघांचा मृत्यू झाला. तीन आमच्या घरातले आणि एक माझ्या बहिणीचा मुलगा आहे. एकाच दिवशी चार जण गेले. हे केवळ आणि केवळ विषारी दारूमुळेच झालं आहे. ते दारू पिऊन आले आणि उलट्या करायला लागले. डॉक्टरकडे नेईपर्यंत सगळं संपलं होतं. डॉक्टरांनी थेट मृत घोषित केलं, असे ती म्हणाली.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, दारू पिल्यानंतर काही वेळातच बाधितांची प्रकृती वेगाने खालावली. ते घरातून चांगले गेले होते, पण तिथून आल्यावर माशासारखे तडफडायला लागले. ना बोलणं, ना चालणं… काही समजायच्या आत सगळा खेळ खल्लास झाला, अशा शब्दांत महिलांनी रात्रीचा थरार सांगताना हंबरडा फोडला.
“पोलीस हफ्ता घेतात आणि निघून जातात!”
यावेळी काही महिलांनी परिसरातील बेकायदेशीर दारू धंद्यांवर तीव्र असंतोष व्यक्त केला. तर एका वृद्ध महिलेने पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “आम्ही म्हातारे झालो, पण या महिन्यात दारूमुळे खूप माणसं मेली. पोलीस कोणतीही कारवाई करत नाहीत. पोलिसांना हफ्ता मिळतो, ते कशाला कारवाई करतील? पैसे घेतात आणि जातात. पोलीस आले की १० मिनिटं दारूचा धंदा बंद होतो आणि ते गेले की पुन्हा सुरू होतो,” असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.
तर दुसऱ्या एका महिलेने लहान मुलांच्या भविष्याची चिंता व्यक्त करत सांगितले की, “दारूमुळे अख्खी घरं उद्ध्वस्त व्हायला लागली आहेत. लहान लहान मुलंही दारू प्यायला लागलीत. लेकरं-बाळं रस्त्यावर आली आहेत. ही दारू कायमची बंद झालीच पाहिजे.” तर एका मुलीने आपल्या वडिलांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. “माझे बाबा दारूशिवाय पाण्याचा घोटही पित नव्हते, दारू असल्याशिवाय ते दोन-दोन दिवस जेवतही नव्हते. या दारूने आमचं सगळं संपवलं.” अशी व्यथा वडिलांनी मांडली.
फॉरेन्सिक टीम दाखल; मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश
या घटनेची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्र्यांनी कुणाचीही गय करू नका, दोषींवर कठोर कारवाई करा, असे आदेश दिले आहेत. संशयित मुख्य विक्रेता योगेश वानखेडे याला राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतले असून, त्याने विक्री केलेले दारूचे कॅन जप्त केले आहेत. दरम्यान, या दारूमध्ये नेमके कोणते रसायन होते, हे शोधण्यासाठी फॉरेन्सिक टीम दापोडी पोलीस ठाण्यात दाखल झाली असून, दारूचे सॅम्पल तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.