वातावरण बदल की काय, IMD कडून मार्च महिन्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट

| Updated on: Mar 16, 2023 | 10:58 AM

पुणे हवामान विभागाने गुरुवार आणि शुक्रवारी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान होणार आहे. मार्च महिन्यात ऑरेंज अलर्ट देण्याची प्रथमच वेळ असेल.

वातावरण बदल की काय, IMD कडून मार्च महिन्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट
rain in maharashtra
Image Credit source: social media
Follow us on

पुणे : राज्यात पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ासाठी हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परंतु त्यात आता गुरुवार आणि शुक्रवारी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांनाही शेती कशी करावी? हा प्रश्न या बदलांमुळे पडला आहे.

कुठे आहे ऑरेंज अलर्ट

राज्यातील जवळपास 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट म्हणजेच मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली यांचा समावेश याहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. या जिल्ह्यांत आज दिवसभरात मुसळधार पावसाची शक्यता यामुळे नागरिकांनी गरज नसेल तर घराबाहेर पडू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

गुरुवारनंतर शुक्रवारी ऑरेंज अलर्ट


गुरुवारी 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिल्यानंतर शुक्रवारी 17 मार् चरोजी 9 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यात अहमदनगर, परभणी, हिंगोली, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. शनिवारी 18 मार्चपर्यंत राज्यातील ढगाळ वातावरण निवळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

साताऱ्यात पाऊस

सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसानं वाई,जावली, साताऱ्यातील ग्रामीण भागाला झोडपून काढलं .जिल्ह्यात विविध ठिकाणी हा पाऊस पडला आहे. या पावसामुळॆ शेतक-यांच्या पिकाला फटका बसला आहे. यात बागायती शेती आणि ज्वारी,गहू पिकाचं नुकसान झाल आहे.अनेक ठिकाणी ज्वारी आणि गव्हाचे उभे पीक आडवी पडली आहे.

जळगाव जिल्ह्यात पाऊस


जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात काल रात्री अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लोनवाडी परिसरात शेतकऱ्यांच्या घरावरील टिनपत्रे उडाली. शेतकऱ्यांचे हरभरा मका गहू या पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी लवकर पंचनामा करण्याची मागणी केली आहे.

मुंबईत पाऊस

मुंबई उपनगरासह ठाण्यात देखील पावसाच्या सरी कोसळताना आपल्याला पाहायला मिळाल्या. नवी मुंबईत देखील ढगाळ वातावरणाची निर्मिती झाल्यामुळे पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. अजून दोन दिवस ढगाळ वातावरणात तसेच पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.