मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा, बीडमध्ये आक्रोश परिषदेद्वारे नुकसानाची दाहकता मांडणार: राजू शेट्टी

मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय.

मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा, बीडमध्ये आक्रोश परिषदेद्वारे नुकसानाची दाहकता मांडणार: राजू शेट्टी
राजू शेट्टी
| Edited By: | Updated on: Oct 05, 2021 | 1:09 PM

पुणे: मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीची अद्याप घोषणा झालेली नाही. मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी बीड जिल्ह्यात 11 तारखेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आक्रोश परिषद आयोजित कऱण्यात आल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे.

मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा

राजू शेट्टी यांनी मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजाराची मदत करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. घराची पडझड झालेल्या आणि जनावरं मेलेल्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केलीय.

आक्रोश परिषद कुठं होणार?

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी आणि ओला दुष्काळ जाहीर व्हावा, यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी आक्रोश परिषदेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती राजू शेट्टी यांच्याकडून करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात आक्रोश परिषद 11 तारखेला होणार आहे.

बीड जिल्ह्यातूनचं राजू शेट्टी शेतकऱ्यांचा आक्रोश मांडणार आहेत. बीड जिल्ह्यातील तलवाडा इथं आक्रोश परिषद होणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे.

औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन

औरंगाबादमधील शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी तरुण शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलं आहे. औरंगाबादच्या सलीम अली सरोवरात जलसमाधी आंदोलनासाठी तरुण उतरला आहे. तरुणानं नुकसान भरपाई मिळाली नाही तर विष प्राशन करून जलसमाधी करणार असल्याचा इशारा दिला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदन देऊन तरुणाचं आंदोलन सुरू असल्याची माहिती आहे. दोन दिवसांच्या आत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या अन्यथा विष प्राशन करून घेणार जलसमाधी असा इशारा त्यानं दिला होता. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी तरुणानं टोकाचं पाऊल उचललं आहे.

नुकसानभरपाईसाठी  नांदेडमध्ये मोर्चा

नांदेडमध्ये पुरग्रस्ताना तात्काळ मदत द्यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मराठवाड्यातील पुरग्रस्ताना कोल्हापूर सांगलीच्या धर्तीवर मदत द्यावी, अशी आंदोलकांची मागणी आहे. राष्ट्रवादी किसान सभेचे अध्यक्ष शंकर अण्णा धोंडगे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भारतीय आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांने देखील सहभाग नोंदवलाय. एनडीआरएफच्या नियमांना बाजूला ठेऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, तसेच सरसकट नुकसान झाल्याने पंचनामे करण्यात वेळ वाया घालवू नये अशी मागणी या मोर्चा द्वारे करण्यात आलीय. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस, डाव्या पक्षाचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांचा मोठा सहभाग होता.

इतर बातम्या:

शेतकऱ्यांना चिरडणारे मोकाट, मी पोलिसांच्या ताब्यात, प्रियांका संतापल्या, ‘तुझ्या हिमतीला हे घाबरले’, राहुल गांधींनी पाठ थोपटली

Lakhimpur Kheri Violence : उत्तर प्रदेशात ‘जालियनवाला बाग’सारखी परिस्थिती, देशातील शेतकरी उत्तर देतील : शरद पवार

Raju Shetti demanded Maharashtra Government should declare wet draught