डीजे बंदीवरून संजय राऊत यांचं मोठं विधान; मुख्यमंत्र्यांनाच काय दिलं आव्हान?

हे सरकारच अभासी आहे. अभासी गोष्टीत त्यांना आणि त्यांच्या भक्तांना आनंद मिळतो. उज्बेकिस्तानमध्ये रात्री सांगतात जीडीपी वाढला. देशात या पत्रकार परिषद घ्या आणि जीडीपी वाढल्याचे सांगा. पत्रकारांना आकडे द्या. त्यांच्या प्रश्नाला उत्तरे द्या, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींवर केली.

डीजे बंदीवरून संजय राऊत यांचं मोठं विधान; मुख्यमंत्र्यांनाच काय दिलं आव्हान?
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 04, 2026 | 11:37 AM

नागपूरमध्ये डीजेवर बंदी घालण्यात आली आहे. पुण्यात मात्र डीजे बंदीवरून घोळ कायम आहे. या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच घेरलं आहे. डीजे बंदीचा निर्णय हा काही एका शहराचा विषय नाहीये. हा राज्याचा विषय आहे. हा धोरणात्मक विषय आहे. हा धोरणात्मक निर्णय घेण्याची हिंमत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आहे का? असं आव्हानच संजय राऊत यांनी फडणवीस यांना दिलं आहे. कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी हे आव्हान दिलं आहे.

पुण्यात त्यांची सत्ता आहे. नागपूरचे पूर्वीचे आयुक्त पुण्यात आहेत. विशेष म्हणजे हे आयुक्त त्यांचे लाडके आहेत. ते का निर्णय घेत नाही? डीजे का बंद करत नाही? हा धोरणात्मक निर्णय आहे. एका शहराचा निर्णय नाही. डीजे आणि लेझरमुळे लोकांचं मानसिक स्वास्थ बिघडतं. नागरिकांना त्रास होतो. त्यावर बंदी घालणं हा धोरणात्मक निर्णय आहे. त्यावर घालण्याची हिंमत या गृहमंत्र्यांत आहे का? ते डरपोक आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

मग निर्णय का घेत नाही

मुख्यमंत्री कायद्याच्या चौकटीत निर्णय घेऊ म्हणतात. हे कधी कायदा पाळायला लागले? सरकार हे लोकशाहीवादी असेल, लोकभावनेचा आदर करणारे असेल तर लोकांची जी भूमिका आहे, त्यावर निर्णय का घेत नाही? नागपूरला एक निर्णय, पुण्याला वेगळा निर्णय. याला कायद्याची चौकट म्हणता येत नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

भाजपचा खेळ संपलाय

कोल्हापूरमधील खड्ड्यांवरूनही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांनी मुंबईवरून कोल्हापूरला यावं. रस्ते मार्गेच यावं. मग तुम्हाला रस्त्यांचं जाळं दिसेल. नवी मुंबई विमानतळावर जायला मला काल अडीच तास लागले. हे त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर. भाजपवाल्यांवर काय विश्वास ठेवता? त्यांचा खेळ संपलेला आहे. 2029 आधीच त्यांचा खेळ संपला आहे, असा चिमटा त्यांनी काढला.

त्यांची ओळख थापेबाज

यावेळी त्यांनी जीडीपी वाढल्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा भाजपवर टीका केली. देशाचे पंतप्रधान जेव्हा एखादा दावा करतात तेव्हा खरं म्हणजे पंतप्रधानांच्या बोलण्यावर जनतेचा विश्वास असायला पाहिजे. कारण ते पंतप्रधान आहेत. दुर्देवाने या पंतप्रधांनांची जागतिक ओळख थापेबाज झाली आहे. ते खोटं बोलतात. इतकं खोटं बोलतात, त्यांनी देशालाही खोटं ऐकण्याची सवय लावली. गेल्या काही काळापासून देशाचं चित्र बदलत आहे. त्यामुळे पंतप्रधानांचा खोटेपणा लोकं स्वीकारत नाही, असा हल्ला त्यांनी चढवला.

हे जीडीपी वाढल्याचं लक्षण नाही

देशाचा जीडीपी वाढला म्हणजे काय झालं? ते त्यांनाही सांगता येईल का? देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली असा त्याचा अर्थ आहे. ते आकडे सांगतात. अमूक ट्रिलियन होणार, तमूक ट्रिलियन होणार… हे आमच्या आकलनापलिकडे आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे. कर्जमाफी झाली पाहिजे. आत्महत्या थांबल्या का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणं हे काही जीडीपी वाढण्याचं लक्षण नाही. आजही मोदींनी फेकलेल्या 10 किलो अन्नावर 85 कोटी लोक जगतात. हे जीडीपीचं लक्षण नाही. किती रोजगार निर्माण झाले? कोट्यवधी बेरोजगार रस्त्यावर आहेत. निवडणुका आल्यावर लाडक्या बहिणीला पैसे देणं हे जीडीपी वााढल्याचं लक्षण नाही. जीडीपी वाढला म्हणतो तेव्हा जनतेचं राहणीमान, आर्थिक स्थैर्य वगैरे आले पाहिजे. पण तसं काही घडत नाही. पोरं आंदोलन करत आहेत. रस्त्यावर खड्डे आहेत. याला जीडीपी वाढल्याचं ते सांगत असेल तर ते असो, अशी टीकाही त्यांनी केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us