‘पुण्याच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात येण्याआधी मी काळजीत होतो’, गर्दीवरुन शरद पवारांची टोलेबाजी
राष्ट्रवादी काँग्रेसच अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे कार्यालयात झालेल्या गर्दीवर टोलेबाजी केली. "पुण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कार्यालयात येण्याआधी मी काळजीत होतो," असं मत त्यांनी व्यक्त केलं.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे कार्यालयात झालेल्या गर्दीवर टोलेबाजी केली. ते म्हणाले, “पुण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कार्यालयात येण्याआधी मी काळजीत होतो. कारण या कार्यालयाची सुरुवात मी दिवसभर टीव्हीवरच पाहत होतो. म्हणूनच निघण्यापूर्वी मी चौकशी केली. जायला अनुकुल असल्याची माहिती मिळाल्यानंतरच मी इथं आलो.” (Sharad Pawar comment on crowd in Pune, Farmer protest ED raid Modi Government)
दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक कशासाठी?
दिल्लीत झालेल्या बैठकीवर बोलताना शरद पवार यांनी माध्यमांवर चुकीचा अर्थ काढल्याचा आरोप केला. दिल्लीतील बैठक अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर चर्चा करण्यासाठी ही बैठक असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. ते आंदोलन अराजकीय असून तेथे राजकारण्यांना बाजूला ठेवण्यात आलाय. मात्र, त्यांना पाठिंबा देण्यासाठी काय करता येईल, यावर चर्चा करण्यात आली.
अनिल देशमुखांवर धाडी, यत्किंचितही चिंता नाही
“हे काही नवीन नाही. अनिल देशमुखांच्या आधीही अनेकांबाबत केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर झाला आहे. त्याची आम्हाला चिंता वाटत नाही. तसंच त्याला महत्व देण्याचीही गरज नाही. यापूर्वीही देशमुख यांच्या घरावर छापेमारी करत त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्यात आला. पण त्यात काही हाती लागलं नाही. आताही काही लागणार नाही. त्यामुळे त्याबाबत आम्हाला कसलीच चिंता वाटत नाही. आमच्यासाठी हे नवं नाही, अनिल देशमुखांच्या कुटुंबीयांवर, त्यांच्या मुलाच्या व्यवसायावर केंद्राने लक्ष ठेवलं होतं, त्यांच्या हाती काही लागलं नाही, त्या नैराश्यातून हा त्रास देण्याचा प्रयत्न.. त्याबद्दल यत्किंचितही चिंता नाही,” असंही शरद पवार यांनी सांगितलं.
चंद्रकांत पाटील कर्तृत्वान गृहस्थ
ठराव करुन चौकशीचे मागणी करण्याची (अजित पवार, अनिल परब) ही पहिलीच घटना आहे. चंद्रकांत पाटील हे मोठे कर्तृत्वान गृहस्थ आहेत, यापूर्वी कधी झाल्या नाहीत त्या गोष्टी करण्यात त्यांचा लौकीक, त्यांनी पुढाकार घेऊन असं काही केलं तर आश्चर्य नाही. चौकशी यंत्रणा त्यांच्या हातात आहेत, त्यांचं स्वागत आमचे सर्व सहकारी करतील
विचार दडपण्यासाठी यंत्रणांचा वापर
जो विचार आपल्याला मान्य नाही, तो विचार दडपण्याचा प्रयत्न ईडी सारख्या यंत्रणांकडून होत आहे.. हे अनेक राज्यात होत आहे.. केंद्रातील सत्ता यांच्या हातात आल्यानंतर हे घडत आहेत.. लोक सुद्धा त्यांची गांभीर्याने नोंद घेत नाहीत.
काँग्रेसला शुभेच्छा
प्रत्येक पक्षाला संघटना वाढवण्याचा अधिकार, आमची काहीच तक्रार नाही, कार्यकर्त्यांची उमेद वाढवण्यासाठी आम्ही सर्व बोलत असतो, काँग्रेसचाही तो अधिकार आहे.