शिवसेना दिल्लीच्या तख्तापर्यंत कशी पोहचली? राऊतांनी गमक उलगडलं, कोल्हापूरच्या पाटलांनाही आव्हान

| Updated on: Sep 26, 2021 | 2:25 PM

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज शिवसैनिकांना पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेची सत्ता आणण्याचं आवाहन केलं. (shivsena is successful because of bmc and thane corporation, says sanjay raut)

शिवसेना दिल्लीच्या तख्तापर्यंत कशी पोहचली? राऊतांनी गमक उलगडलं, कोल्हापूरच्या पाटलांनाही आव्हान
संजय राऊत, खासदार, शिवसेना
Follow us on

पिंपरी-चिंचवड: शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज शिवसैनिकांना पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेची सत्ता आणण्याचं आवाहन केलं. तसेच शिवसैनिकांना कशा पद्धतीने काम केलं पाहिजे? शिवसेनेसाठी महापालिकेचं महत्त्व किती महत्त्वाचं आहे, हे सांगतानाच शिवसेना दिल्लीच्या तख्तापर्यंत कशी पोहोचली याचं गमकच संजय राऊतांनी शिवसैनिकांना सांगितलं. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही त्यांनी थेट आव्हान दिलं. (shivsena is successful because of bmc and thane corporation, says sanjay raut)

इतक्या वर्षानंतरही आपण तेच बोलतो. घराघरात सेना पोहोचली पाहिजे. का पोहोचली नाही ते सांगा. वर्षानुवर्ष आमदार आणि खासदार आपण निवडून आणतो. पण महापालिका आली की आपल्या फुग्यातील हवा का निघून जाते? शिवसेनेचं यश जे आहे त्या मागे महापालिकेतील काम आहे. महापालिकेच्या कामामुळेच आपण देशाच्या तख्तापर्यंत पोहोचलो आहे, असं दिल्लीतील तख्तापर्यंत पोहोचण्याचं गमक सांगतानाच अशा प्रकारचं काम पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये झालं पाहिजे, असं आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केलं.

दादा, अंगावर येण्याचा प्रयत्न करू नका

यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही थेट आव्हान दिलं. कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील पुण्यातून निवडून येतात. ठिक आहे. घासून निवडून आले असतील. यावेळेला आपण महापालिकेत घासून का होईना पण ठासून निवडून येऊ. चंद्रकांत दादांना पुण्यात येऊ द्या. हा महाराष्ट्र आहे. कोल्हापूरचे गडी पुण्यात आले त्याचं वाईट वाटत नाही. फक्त आमच्या अंगावर येऊ नका. एवढंच आम्हाला सांगायचं आहे. कोणीही आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा त्यांनी दिला.

हे चित्रं काही योग्य नाही

मागच्यावेळी चारचा प्रभाग झाला. त्याचा फटका आपल्याला बसल्याचं कुणी तरी सांगितलं. आपल्याला फटका बसला मग त्यांना का नाही बसला? ते सत्तेत आले. त्यांना का नाही फटका बसला? आपल्याला फटका बसला याचं कारण आपला पाया ढेपाळला होता. आपली संघटनात्मक बांधणी योग्य नव्हती. आपण लोकांपर्यंत पोहोचायला कमी पडलो. आपला पक्ष कमी पडला. सरकारने किती प्रभाग केले ते महत्त्वाचं नाही तुम्ही कोणत्या ध्येयाने पुढे जाता हे महत्त्वाचं आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात आपल्या पक्षाचा जयजयकार होतो आणि मुंबईच्या जवळ असलेल्या पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याला आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो हे चित्रं काही चांगलं नाही, असं राऊत म्हणाले.

अजितदादा आमचं ऐका

पुणे जिल्ह्यात आपले कोण आयकत नाही असं काही सांगतात. असं कसं? मुख्यमंत्री आपले आहेत. अजित पवारही मुख्यमंत्र्यांचं ऐकतात. त्यांना सांगू आमचेही ऐका. नाही तर आज मुख्यमंत्री दिल्लीला गेलेत? असं राऊत यांनी म्हणताच एकच हशा पिकला. त्यानंतर राऊत यांनी लगेच सारवासारव करण्यास सुरुवात केली. बघा चुकीचं ऐकू नका. माझं पूर्ण ऐका. चुकीचं लिहू नका. नाही तर लगेच ब्रेकिंग सुरू झालं असेल. मुख्यमंत्री दिल्लीचा अंदाज घ्यायला गेले आहेत. उद्या आपल्यालाही दिल्लीवर राज्य करायचं आहे. दिल्लीत कोणतं ऑफिस कुठे आहे, पंतप्रधान कुठे बसतात याचा अंदाज घ्यायला मुख्यमंत्री दिल्लीत गेले आहेत, अशी सारवासारवही त्यांनी केली. (shivsena is successful because of bmc and thane corporation, says sanjay raut)

संबंधित बातम्या:

हिम्मत असेल तर आता माझा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा, किरीट सोमय्यांचं महाविकास आघाडीला आव्हान

नक्षलवादी भागात विकास करण्यासाठी 1200 कोटींचा निधी द्या; उद्धव ठाकरेंचं शहांसमोर सादरीकरण

मुंबईतील शाळा सुरू करण्याचा फॉर्म्युला ठरला; वर्षा गायकवाड आणि पालिका आयुक्तांच्या चर्चेतून निघाला मार्ग

(shivsena is successful because of bmc and thane corporation, says sanjay raut)