Raigad Rain | रायगडमध्ये अतिवृष्टीचा कहर, 5 जण बेपत्ता, शोध मोहीम सुरु

| Updated on: Jul 20, 2021 | 10:44 AM

रायगडमधील स्थानिक प्रशासन, पोलीस, रेस्क्यू टिमसोबत आपत्ती व्यवस्थापनाची शोध मोहीम सुरु आहे. मात्र अद्याप त्यांना यश आलेले नाही. 

Raigad Rain | रायगडमध्ये अतिवृष्टीचा कहर, 5 जण बेपत्ता, शोध मोहीम सुरु
raigad rain
Follow us on

रायगड : गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने कोसळणाऱ्या पावसाने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगडसह कोकण किनारपट्टी भागाला अक्षरश: झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे सर्वत्र एकच दाणादाण उडाली आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे एकूण 5 जण बेपत्ता झाले आहे. सध्या या पाचही जणांचा शोध घेतला जात आहे. मात्र अद्याप त्यांना यश मिळालेले नाही.

शोध मोहिम सुरु

रायगडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या या तुडुंब भरुन वाहत आहे. तसेच शहरातील अनेक नाले दुथडी भरुन वाहत आहे. रायगडमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल पाच जण बेपत्ता झाले आहेत. रायगडमधील स्थानिक प्रशासन, पोलीस, रेस्क्यू टिमसोबत आपत्ती व्यवस्थापनाची शोध मोहीम सुरु आहे. मात्र अद्याप त्यांना यश आलेले नाही.

एकूण 5 जण बेपत्ता

रायगडमधील म्हसळा तालुक्यातील मौजे मेदंडी येथे राहणारे 42 वर्षांचे सुरेश हरेश कोळी हे मासेमारीसाठी खाडीमध्ये गेले होते. मात्र त्यांची बोट उलटल्याने ते बेपत्ता झाले आहेत. तर कर्जत तालुक्यातील मौजे देवपाडा गावातील प्रमोद जोशी हा 26 वर्षांचा तरुण पोशीर नदीच्या प्रवाहामध्ये वाहून गेला. सध्या स्थानिक प्रशासनाकडून त्याचा शोध सुरु आहे.

त्याशिवाय मौजे पोयंजे येथील पाली बुद्रुक डॅमवर पोहोण्यासाठी गेलेला दिपक गंभीरसिंग ठाकूर हा तरुण देखील बेपत्ता झाला आहे. तर खालापूर तालुक्यामधील खोपोलीतील क्रांतीनगर मधील दोन लहान मुले पाताळगंगा नदीपात्रात वाहून गेली आहेत. ही मुले सख्खे भाऊ-बहिण आहेत. सध्या स्थानिक प्रशासनाकडून शोधमोहीम सुरु आहे. सर्च ऑपरेशन हाती घेऊन आतापर्यंत पाच तास उलटले आहेत. परंतु अद्याप या चिमुकल्यांचा शोध लागलेला नाही.

निलम श्रीकांत हंचलीकर (7) बाबू श्रीकांत हंचलीकर (5) अशी या वाहून गेलेल्या दोन चिमुकल्यांची नावं आहेत. या मुलांना शोधण्यासाठी खोपोली पोलिसांनी स्थानिकांसोबत शोधमोहीम सुरु केली आहे.

रायगडमधील नद्यांना पूर 

दरम्यान रायगड जिल्ह्यात रात्रीपासून सर्वत्र पाऊस कमी झाला आहे. रायगडमधील कुडंलिका, आबां आणि पातळगंगा नदी इशारा पातळीपेक्षा जास्त वेगाने वाहत आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर रात्री खालापूर टोलनाका परिसरात घाट चढताना दरड कोसळल्याची घटना घडली. खोपोली हद्दीत त्याठिकाणी हायवे एक्स्टेंशनचे काम सुरु आहे. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही.

बोरघाट पोलीस आणि आय. आर.बी यत्रंणेने दरड हटवून युद्ध पातळीवर काम सुरु आहे. ट्रॅफिकचा अडथळा दूर केला आहे. मुरुड तालुक्यातील राजपुरी येथे दरड कोसळून 4 घरांचे नुकसान झाले होते. त्याठिकाणी दरडीमधील भेगा रुंदावल्या असल्याचे पहायला मिळाले. तिथे संरक्षक भिंत बाधंण्याची मागणी होत आहे. काल रात्रीपासून पाऊस कमी झाल्याने पाणी ओसरले. त्यामुळे पाली खोपोली आणि खुरावले भैरव रस्ता रहदारीकरिता खुला करण्यात आला आहे.

 

(Raigad heavy rains 5 people missing search operation underway)

संबंधित बातम्या : 

Mumbai Rains: मुंबईत पावसाचा कहर सुरूच, मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत; चाकरमानी वैतागले

मुंबईपाठोपाठ नवी मुंबईतही पावसाचा कहर, 12 तासात 200.88 मिमी पाऊस

पावसामुळे ओढ्याला पूर, नवी मुंबईजवळ धबधब्यावर अडकलेल्या 116 पर्यटकांची सुटका